सल्लागार कंपन्या प्रतिसाद देत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे
पुणे – तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता या दरम्यानच्या नियोजित भुयारी मार्गासाठी सल्लागार कंपन्या प्रतिसाद देत नसल्याने हा प्रकल्प पुढेच जात नसल्याचे दिसून आले आहे.
धायरी, सनसिटी, विठ्ठलवाडी, वडगाव, नांदेड सिटी आणि खडकवासला या परिसराला जोडणारा सिंहगड रस्ता हा एकमेव पर्याय आहे. या भागातून शहराच्या दक्षिणेला असणाऱ्या सहकारनगर, बिबवेवाडी, महर्षीनगर, कोंढवा, महंमदवाडी आणि लष्कर भागांकडे जाण्यासाठी कात्रज बाह्यवळण मार्गाचा किंवा स्वारगेटमार्गे सातारा रस्त्याचा वापर करावा लागतो. या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण असल्याने दररोज वाहतूक कोंडी होते. तसेच कोथरूड, कर्वेनगरकडून धनकवडीकडे ये-जा करण्यासाठी स्वारगेट मार्गे सातारा रस्ता किंवा बंगळुरू हायवेचा वापर करावा लागतो. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागांतील काही रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येतो. या पार्श्वभूमीवर तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता यादरम्यान बोगदा करून भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.
महापालिकेच्या उर्वरित विकास आराखड्याला राज्य शासनाने फेब्रुवारी 2018 मध्ये मंजुरी दिली. यात तळजाई टेकडी ते सिंहगड रस्त्याला जोडणाऱ्या प्रस्तावित बोगद्याचा समावेश होता. या कामासाठी 2018-19 च्या अंदाजपत्रकात स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर प्रशासनाने प्रकल्पाच्या तांत्रिक गोष्टींच्या तपासणीसाठी आणि प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी तीनवेळा जाहिराती प्रसिद्ध केल्या. मात्र, कोणत्याही सल्लागार कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही.