सणबूर -ग्रामविकासात दिशादर्शक ठरलेली पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आता राज्यातील पहिले “गो ग्रीन व्हिलेज’ ठरले आहे. संपूर्ण गावातील वीजग्राहकांनी वीज बिले ईमेलद्वारे स्वीकारण्याचा उपक्रम राबवला आहे. कागदावरील छापील बिलांसाठी होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी मान्याचीवाडीने एक पाऊल पुढे टाकल्याने महावितरणकडूनही गावकऱ्यांचे कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांनाही प्रत्येक बिलात सूट मिळणार आहे.
स्थापनेपासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने वसुंधरा आणि जैवविविधतेचे संवर्धन, संगोपन करण्याचा निर्धार केला. त्यासाठी गावात बैठक घेऊन सरपंच रवींद्र माने यांनी गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. महावितरण कंपनीची ग्राहकहिताची आणि पर्यावरणरक्षणाची “गो ग्रीन’ योजना समजावून सांगितली.
त्यातून ग्राहकांना मिळणारे फायदे आणि कागदाची बचत, पर्यायाने वृक्षसंवर्धनाबाबत जागृती केली. त्यानंतर गावातील 120 वीजग्राहकांनी “गो ग्रीन’ योजनेत सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब केले. ग्रामपंचायतीतील “आपले सरकार’ केंद्राचे चालक मोरे यांनी “गो ग्रीन’ योजनेत वीजग्राहकांची ऑनलाइन नोंदणी केली. प्रत्येक ग्राहकाच्या बिलासाठी ग्रामपंचायतीचा ईमेल आयडी दिला. गावातील 120, म्हणजे शंभर टक्के ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदवला. यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. बुंदेले, उपअभियंता ए. ए. आदमाने, शाखा अभियंता डी. एम. शेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
- काय आहे संकल्पना…
छापील वीज बिले
ग्राहकांना येणार नाहीत
वीज बिलासाठी लागणाऱ्या कागदाची बचत होईल
कागद निर्मितीसाठी होणारी वृक्षतोड थांबेल
पर्यावरणाची हानी टळेल
ग्राहकांना दरमहा
बिलात सूट मिळेल
- मान्याचीवाडी या छोट्या ग्रामपंचायतीने पर्यावरणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. गावातील सर्व वीजग्राहकांनी गो ग्रीन योजनेत सहभाग नोंदवला आहे. हा निर्णय आदर्शवत असून, ही योजना राबवणारी मान्याचीवाडी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
आर. एस. बुंदेले - राज्यात 28 लाख ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधी वीजग्राहक आहेत. वीज बिलांच्या छपाईसाठी दरमहा हजारो टन कागद लागत असल्याने मोठी वृक्षतोड होते. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यावर ग्राहकांनी निर्बंध घातले, तर पर्यावरण संवर्धन होऊन त्यांनाही लाभ मिळेल. यासाठी प्रबोधन गरजेचे आहे.
रवींद्र माने