नवी दिल्ली – कॉंग्रेसने शुक्रवारी पाच छाननी समित्या स्थापन केल्या. त्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची निवड करतील. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी संबंधित समित्यांवर सोपवण्यात आली आहे.
मधुसूदन मिस्त्री, रजनी पाटील, हरीष चौधरी, भक्तचरण दास आणि राणा के.पी.सिंह या ज्येष्ठ नेत्यांना कॉंग्रेसने छाननी समित्यांचे अध्यक्ष बनवले आहे. मिस्त्री यांच्या समितीकडे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गोवा, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या समितीच्या सदस्यांमध्ये सुरज हेगडे, शफी परंबिल यांचा समावेश आहे.
तेलंगणा, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीची सुत्रे चौधरी यांच्या नेतृत्वाखालील समिती सांभाळेल. विश्वजीत कदम आणि जिग्नेश मेवाणी त्या समितीचे सदस्य आहेत.
पाटील यांच्या नेतृत्वाखालील समिती गुजरात, मध्यप्रदेश, छत्तिसगढ, राजस्थान, दिल्लीमधील संभाव्य उमेदवार निवडेल. सिंह प्रमुख असणाऱ्या समितीकडे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीमची जबाबदारी असेल. तर, दास यांच्या नेतृत्वाखालील समिती उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाखचे कार्य सांभाळेल. सर्व सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेतेही संबंधित समितीचे सदस्य असतील.