बंगळुरू- कमालीच्या गरीबीमुळे खायला अन्नही नाही अशा अवस्थेमुळे पाच जणांच्या कुटुंबाने आपले जीवन संपवल्याचा प्रकार येथे उघडकीला आला आहे.या घरातल्या एका नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा भुकेने तडफडून मृत्त्यू झाल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनाला आली आहे असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या घरातील अडीच वर्षांची एक चिमुरडी वाचली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
भारती (वय 54), सिंचना (वय 34), सिंधुराणी (वय 31) आणि मधुसागर (वय 25) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे असून एक नऊ महिन्याच्या बालकाचाहीं यात मृत्यू झाला आहे. घरातील प्रमुख व्यक्ती हेलगीरी शंकर हे बाहेरगावी गेले होते. चार पाच दिवसांनी ते परत आले. त्यावेळी त्यांना घरातील या लोकांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांचे मृतदेह दोरीला लटकलेल्या स्थितीत आढळले आहेत.
अशाच प्रकारची घटना सन 2018 मध्ये घडली होती. त्यावेळी एकाच कुटुंबातील अकरा जणांनी आत्महत्या केली होती. त्या कुटुंबाच्या आत्महत्येचे कारण वेगळे होते असे सांगण्यात येते तथापि कमालीच्या गरीबीमुळे कुटुंबेच्या कुटुंबे आत्महत्या करीत असल्याच्या प्रकारात देशात वाढ होताना दिसते आहे.