औरंगाबाद – प्रत्येक पित्यासाठी आपल्या मुलीचं लग्न लावून देणं आयुष्यातील सर्वात मोठं कर्तव्य असतं. आपल्या मुला-मुलींची लग्न होऊन ते संसाराला लागले की, सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त झाल्याची भावना माता-पित्याची असते. असाच काहीसा विचार औरंगाबाद येथील पित्याने केला होता. मात्र मुलीचं लग्न राहिलं दूर, खचलेल्या पित्याने आपली जीवनयात्रा संपवली.
येत्या १९ नोव्हेंबरला लग्नाची तारिख निश्चित असताना मुलगी घरातून पळून गेली. मुलगी ऐन लग्नाच्या चार दिवस आधी घरातून पळून गेल्याने मुलीचे वडिल खचून गेले. खचलेल्या अवस्थेत त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. संग्रामनगर उड्डानपुलाच्या परिसरात शनिवारी ही घटना घडली. संजय वाकेकर (45) असं मृत पित्याचं नाव आहे.
संजय वाकेकर हे खासगी गाडीवर चालक म्हणून काम करत होते. त्यांनी नात्यातील मुलासोबत मुलीचं लग्न जुळवलं होतं. लग्नाची तारीख काढली होती. तयारीही अंतिम टप्प्यात होती. डीजे, मंगल कार्यालय, फोटोग्राफर अशी सर्व बुकींग झाली होती. त्यासाठी दीड लाख रुपये अदा करण्यात आले होते.
दरम्यान शनिवारी दुपारी ३ वाजता मुलगी घरातून निघून गेली. मुलीचा काहीच शोध न लागल्याने अखेर लग्न मोडावं लागलं. मात्र समाजात बदनामी होईल या भितीने संजय वाकेकर यांनी चिकलठाण्याकडून येणाऱ्या मालगाडी रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.