Bharat Ratna : पाच जणांना यंदा भारतरत्न जाहीर झाला आहे. कर्पूरी ठकूर, लालकृष्ण आडवाणी, चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. स्वामीनाथन. ही पाच नावे मोठीच आहेत. यातील डॉ. स्वामीनाथन वगळता अन्य चौघांचे राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आणि लक्षणीय आहे. त्यांना भारतरत्न दिल्यामुळे ते मोठे झाले आहेत अशातला भाग नाही. मात्र हा किताब मिळाल्यामुळे ही मंडळी आता कायमस्वरूपी स्मरणात राहतील, एवढे मात्र खरे. मात्र केवळ त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करणे अथवा योगदानाचे स्मरण करणे एवढा एकमात्र उद्देश यामागे नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. एका सुनिश्चित रणनीतीद्वारे हे सगळे निर्णय घेतले गेले आहेत. त्याला लोकसभा निवडणुकीची पाश्र्वभूमी आहे. पुरस्कार जाहीर करण्याची वेळ पाहता काहीतरी लाभाच्या अपेक्षेनेच हे केले गेले आहे.
कर्पूरी ठाकूर यांना प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस अगोदर पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराने ठाकुर यांचे देशवासियांनी पुन्हा स्मरण केलेच, मात्र त्याहुन वेगळी घटना वर्तमान राजकाणात घडली. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला. गेल्या ४८ तासांपासून आणखी एक चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकारणात रंगली होती. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी आता समाजवादी पक्षाचा निरोप घेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वाटेवर आहेत. त्यांचे आजोबा चौधरी चरणसिंह यांना आज भारतरत्न जाहीर करण्यात आले. जयंत चौधरींची दिल जीत लिया ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
या केवळ घोषणा आहेत. त्यामागचे राजकारण आणि त्याचे फलित येत्या काही दिवसांत उघड होत जाणार आहे आणि त्यामुळे देशाच्या राजकारणातही काही धक्कादायक बदल पुन्हा पहायला मिळतील. मोदी सरकारचे आणि शेतकऱ्यांचे विशेषत: हिंदी भाषिक पट्ट्यातील शेतकऱ्यांचे फारसे सख्य नाही. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केले आणि काही शेतकऱ्यांचा त्या आंदोलनात बळीही गेला. आता दोनच दिवस झाले शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणूक तीन-चार महिन्यांत होईल. शेतकऱ्यांची नाराजी परवडणारी नाही. तेच गणित डोक्यात ठेवत शेतकऱ्यांचे मसीहा चौधरी चरणसिंह यांनी सर्वोच्च किताब जाहीर करण्यात आला. जयंत चौधरी आणि पूर्व उत्तर प्रदेश आणि एकूणच जाट समुदायात सरकारने अर्थात भाजपने या घोषणेद्वारे आपला मार्ग प्रशस्त केला आहे.
नरसिंह राव मोठे नेते. कॉंग्रेसचे दिग्गज आणि इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषविली. मुळात राव अत्यंत विद्वान राजकारणी. बहुभाषांचे त्यांना ज्ञान आणि कुशाग्र बुध्दीमत्ता. सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेसमधील उदयकाळात राव मागे पडले आणि नंतर त्यांची कॉंग्रेसच्या राजकारणात अवहेलनाच झाल्याचे म्हटले जाते. त्यात बऱ्यौपकी तथ्यही आहे.
राव यांच्या निधनानंतर आता अलिकडेच इतक्या वर्षानंतर गांधी कुटुंबीयांशी जवळीक सांगणाऱ्या मणिशंकर अय्यर यांनी राव यांचा अवमान केला. राव यांना भारतीय जनता पार्टीचे पहिले पंतप्रधान असे संबोधत अय्यर यांनी राव यांचा अवमान केला. त्याद्वारे अय्यर यांना कोणाला खुश करायचे होते व का, आणि त्या विधानाचे आता कोणते औचित्य होते हे सांगता येणार नाही. तथापि, त्याच राव यांना आता भारतरत्न देत कॉंग्रेसला डिवचण्याचा किंवा धक्का देण्याचा मोदी यांचा प्रयत्न नसेल असे मानणे चुकीचे. आंध्र प्रदेश आणि दक्षिणेकडच्या अन्य राज्यांतील मतदारांनाही साद घालण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. कर्पूरी ठाकुर यांच्या सन्मानाने बिहारच्या दलित मतदारांमध्ये तर स्वामीनाथन यांच्या गौरवाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्याची सत्ताधारी पक्षाची इच्छा लपून राहीलेली नाही.
ज्या नेत्यांना किताब जाहीर झाला आहे ते आदरणीयचआहेत. त्यामुळे त्यांना गौरवण्याच्या निर्णयावर आता टीका करण्याचा करंटेपणा कोणता राजकीय पक्ष अथवा माध्यमेही करणार याची पुरेपूर खात्री असल्यामुळेच हे निर्णय अचूक टायमिंग साधत घेतले गेले. त्यामागे भाजपने आपले इप्सितही साध्य करण्याची रचना केलेली दिसते.