16 हजार 705 उमेदवार उत्तीर्ण
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतिम निकाल जाहीर झाला. यात एकूण 16 हजार 705 उमेदवार उत्तीर्ण झाले. सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्गातील (एसईबीसी), खुल्या प्रवर्गातील आर्धिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) 113 विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दिलेल्या 5 टक्के गुणांच्या सवलतीचा लाभ मिळाला.
राज्यात 19 जानेवारी 2020 रोजी “टीईटी’ घेण्यात आली. उमेदवारांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकविण्यासाठी पेपर क्रमांक 1 व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. यात पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 688, तर पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवारांनी नोंदणी केली होती.
परीक्षेचा 5 ऑगस्ट रोजी अंतरिम निकाल जाहीर झाला. यात पेपर क्रमांक 1 मध्ये 10 हजार 487, तर पेपर क्रमांक 2 मध्ये 6 हजार 105 असे एकूण 16 हजार 592 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. या निकालावर गुणपडताळणी, जात संवर्ग बदल यासह इतर ऑनलाइन आक्षेप नोंदविण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती.
यात पेपर क्रमांक 1 मध्ये 1 हजार 61, तर पेपर क्रमांक 2 साठी 670 उमेदवारांनी आक्षेप नोंदविले. त्यांची तपासणी करून अंतिम निकाल जाहीर झाला. यात गुणपडताळणीत एकही बदल झाला नाही.