नगर -अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात बाजरी, सोयाबीन व अन्य पिकांच्या बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन बियाणे उत्पादक कंपन्या तसेच त्यांना पाठिशी घालणाऱया कृषी विभागाच्या अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सबंधित कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री व कृषी आयुक्त यांना ई-मेलद्वारे दहातोंडे यांनी ही मागणी केली आहे. या वर्षी समाधानकारण पाऊस झालेला आहे. परिणामी खरिपाच्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, मुग, उडीदाची पेरणी केली. मात्र, नगरसह राज्यातील अनेक भागात बाजरी, सोयाबीन व अन्य पिकांची उगवणच झाली नाही. काही ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात बियाणे खराब निघाले. विविध बियाणे उत्पादक कंपन्यांनी निकृष्ट दर्जाच्या बियाणाचा पुरवठा केल्यामुळेच बियाणे उगवले नाही.
करोनासारख्या गंभीर संकटात सरकार आणि जनता सामना करत आहेत. अशावेळी शेतकरीही अडचणीत आहेत. या अडचणींवर मात करत खरिपाची पेरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बियाणे खराब निघाल्यामुळे पुन्हा दुबार पेरणीचे संकट आले आहे. बियाणे उगवण झाली नसल्याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱयांकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात शेतकरी मराठा महासंघाला आंदोनलाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दहातोंडे यांनी दिला.