नगर,(प्रतिनिधी) – महापालिकेच्या बुरुडगाव कचरा डेपोत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या खत प्रकल्पात नियम पायदळी तुडविले जात आहेत. विशेष म्हणजे कोटीची कोटी उड्डाणे घेऊनही यातून खताचे उत्पादनच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आक्षेप नोंदविले आहेत.
यातून नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. प्रकल्पातील अनयिमितता मनपाच्या अधिकार्यांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचे बील देण्यात आले आहे. याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) गिरीश जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
जाधव यांनी निवेदनात म्हटले, बुरुडगाव येथील खत प्रकल्पात गेल्या साडेचार वर्षांपासून शासनाने निर्देशित केलेल्या निकषांप्रमाणे व नियमानुसार कोणत्याही प्रकारची खतनिर्मिती झालेली नाही. शहरातून संकलित झालेल्या कचर्याचे विलगीकरण होत नाही. विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या मशीन येथे उपलब्ध नाहीत. प्रकल्पातील कचरा डेपोला वर्षभरापूर्वी लागलेली आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही.
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदविलेला आहे. हा प्रकल्प अनेकवेळा बंद असल्याचेच यापूर्वी मनपाच्या अधिकार्यांनी केलेल्या पाहणीमध्ये समोर आलेले आहे. प्रकल्प चालविणार्या अधिकार्यांवर मात्र, अद्यापपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही. त्यांना क्लिनचीट देण्यात आली असून या प्रकल्पात संगनमताने अपहार सुरू आहे.
अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठेकेदाराला मनपाच्या सहायक आयुक्तांनी नोटीस दिलेली आहे. त्यामुळे याबाबत सर्व संबंधितांवर मनपाची फसवणूक करणे व शासकीय रकमेचा अपहार केल्याचा तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा हरित लवादाकडे तक्रार केली जाईल. तसेच न्यायालयातही दाद मागणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.