सातारा -खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्यावतीने नियोजन करण्यात आले असून कुठेही खते, बियाणांची कमतरता भासू नये यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खते, बियाणे यामध्ये भेसळ व गैरप्रकार कदापी खपवून घेतले जाणार नसून कृषी विभागाच्यावतीने कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मंगेश धुमाळ यांनी दिला.
कृषी विभागाच्यावतीने अनुदानावर महाबीज कंपनीकडून उपलब्ध केलेले सोयाबीन, भात व वाटाणा बियाणे तालुकास्तरावर वाटप सुरु आहे. काही तालुक्यांत वाटाणा बियाण्याची उपलब्धता येत्या दोन दिवसांत होईल. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणचे महाबीज कंपनीचे बियाण्याचे प्लॉट नष्ट झाल्यामुळे मागणीनुसार या कंपनीचे बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाही. सेस फंडातून यावर्षी अनुदानात वाढ केली आहे. तालुका पंचायत समितीकडे थेट लाभार्थी हस्तांतरण योजनेअंतर्गत अनुदानित बियाण्यासाठीचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मागविण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक सदस्याकडे अनुदानित बियाणासाठी संपर्क करावा, असे आवाहन धुमाळ यांनी केले आहे. जिल्ह्यासाठी सर्व प्रकारच्या खतांचे 102923 मे. टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी 82113 मे. टन विक्री झाले असून 31020 मे. टन खत सध्या शिल्लक आहे. खतांचा साठा करणे, काळा बाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. खतांच्या मुख्य डिलरने इतर सर्व दुकानदारांना मालाची उपलब्धता सर्व ठिकाणी होण्यासाठी सहकार्य करावे.
बियाण्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील खरीप 2020 च्या पेरणीसाठी ज्वारी, बाजरी, भात, भुईमुग, सोयाबीन, सुर्यफुल, घेवडा, मका, उडीद, मुग, तुर व वाटाणा याची 47804 क्विंटल मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. तीन वर्षाच्या मागणीचा सरासरीत 10 टक्के वाढ करुन मागणी केली आहे. त्यापैकी 39784 क्विंटल बियाणे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रात उपलब्ध झाले आहे. त्यापैकी 29134 क्विंटल बियाण्यांची प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विक्री झाली आहे. 10649 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खते, बि-बियाणे यांचा विक्रीसाठा, रास्तभाव आणि भेसळ याबाबत लक्ष असून दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती धुमाळ यांनी दिली.