नगर, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील एका गावातील महिला सरपंचाला सहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ, मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. गुरूवारी (दि. १५) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. सदरचा प्रकार गावातील कचरा टाकण्यासाठी घेतलेल्या खड्ड्याच्या वादातून झाला आहे.
दरम्यान पीडित जखमी महिला सरपंचाने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून शुक्रवारी सहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊ ऊर्फ रावसाहेब यादव नेटके, गणेश गोरख ससाणे, बॉबी नेटके, दीपक नेटके, अतुल नेटके, राणा नेटके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून गुन्हा दाखल होताच राऊ ऊर्फ रावसाहेब नेटके व गणेश ससाणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरूवारी सकाळी झाली.
सदर ग्रामसभेत एका महिलेने आमच्या शेताकडे कचरा टाकू नका, अशी तक्रार केली होती. त्यावर कचरा टाकण्यासाठी गावातील नदीच्या पलीकडे खड्डा घेण्याचे ठरले होते. गुरूवारी सायंकाळी महिला सरपंच व इतर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा घेण्यासाठी गेले होते. नदीच्या पलीकडे नेटके वस्तीजवळ गावठाण जागेत खड्डा घेत असताना त्या ठिकाणी राऊ ऊर्फ रावसाहेब नेटके व इतर आले. त्यांनी खड्डा घेण्यास विरोध केला असता फिर्यादी यांनी तो खड्डा बुजून टाकला. त्यानंतर देखील नेटके व इतरांनी फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
दरम्यान फिर्यादी यांनी डायल ११२ नंबरवर संपर्क करून पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. जखमी फिर्यादी यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.