कापूरहोळ – नसरापूर (ता. भोर) येथील मेनआळीच्या पाठीमागून जाणाऱ्या शिवगंगा नदीपात्रापासून उंच जमिनीची दिवसेंदिवस झीज आणि कडा कोसळण्याची टांगती तलवार उभी राहल्याने येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने माळीण गावासारखी स्थिती ओढावण्याची शक्यता असून याकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार आहे का, असा प्रश्न होत आहे.
नसरापूर ग्रामपंचायतीअंतर्गत स्मशानभूमी ते मेनआळीमध्ये साधारणत: 50 कुटुंबे राहत असून, शिवगंगा नदीकिनारी जवळपास 15 घरे वसलेली आहेत. शिवगंगा खोऱ्यात पावसाच्या काळात पर्जन्यमान अधिक असल्याने जवळपास दोन महिने नदीला मोठ्या प्रमाणात पूर असतो, यामुळे जमिनीचा उंच भाग निखळला जात असल्याने येथील मेनआळीचे माळीण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
माजी उपसरपंच शंकर शेटे, राजू वाल्हेकर, इरफान मुलाणी, शरद चव्हाण, ज्ञानेश्वर झोरे, हनुमंत कदम, सुधीर वाल्हेकर, भरत येवले प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी केली आहे. नदीच्या काठावर राहत असलेले ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहे. दरवर्षी नदीकिनारी जमिनीचा उंच भाग आणि दरड कोसळू नये, यासाठी ते अक्षरशः प्रार्थना करीत असतात. देवावर हवाला ठेवून जीव मुठीत घेऊन रात्रं-दिवस भितीच्या छायेखाली वावरत असतात. मात्र, प्रशासन याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही.
नसरापूरच्या तलाठ्यांमार्फत अहवाल मिळाला असून, संरक्षित भिंत बांधण्यासाठी तातडीने वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवण्यात येणार असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागालाही कळविले आहे.
– अजित पाटील, तहसीलदार, भोर