रांची – हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असतानाच राज्यपालांनी चंपई सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. शपथविधी सोहळा कधी होणार याची घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र राज्यात आता रिसॉर्टचे राजकारण पुन्हा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार आमदारांचा घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी सत्ताधारी महाआघाडीच्या आमदारांना रांची येथून हैदराबाद येथे नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेचच आमदारांना चार्टर्ड बसमधून सर्किट हाउस येथून बाहेर नेण्यात आले. त्यांना रांची विमानतळावरून विशेष विमानाने हैदराबाद येथे नेले जाणार असल्याचे तेंव्हाच सांगितले गेले होते.
मुख्यमंत्रिपदाचे दावेदार चंपई सोरेन, कॉंग्रेस पक्षाचे आमदार आलमगीर आलम, प्रदीप यादव, राष्ट्रीय जनता दलाचे सत्यानंद भोक्ता आणि माकप (एम एल) चे विनोद सिंह एवढे पाचच आमदार आता रांची येथे थांबले आहेत. हे पाच नेते येथे थांबूनच पुढची रणनीती तयार करणार आहेत.
तेलंगणातील हैदराबाद येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये सर्व आमदारांची सोय केली जाणार असून बाकी जगापासून त्यांचा संपर्क तोडला जाईल असेही सूत्रांनी नमूद केले. तेलंगणात आता कॉंग्रेस पक्षाचे सरकार असल्यामुळे या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने उद्या म्हणजे २ फेब्रुवारी रोजी झारखंडमधील आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
राज्यपालांची भेट घेण्यापूर्वी चंपई सोरेन यांनी राजभवनातून आपल्या आमदारांची गणनाही करवली. त्याचा व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रत्येक आमदार आपला हात वर करून आपली उपस्थिती दर्शवत असल्याचे त्यात दिसून येते आहे.
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना काल जमीन घोटाळा प्रकरणात अटक झाली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या बैठकीत चंपई सोरेन यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोरेन यांनी लगेचच राज्यपालांना पत्र पाठवून लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती त्यांना केली होती.
४७ आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगत ४३ आमदारांची स्वाक्षरी असलेले पत्रही त्यांनी राज्यपालांना दिले आहे. हे सर्व ४३ आमदार राजभवनाच्या गेटबाहेर उभे होते. गेल्या १८ तासांपासून राज्यात कोणते सरकारच नसल्याची स्थिती आहे व त्यामुळे संभ्रमाचे वातावरण असल्याचे चंपई सोरेन यांनी म्हटले होते.