हिंगोली – जिल्ह्यात चार पाच दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना आधीच अतिवृष्टीचा फटका बसला आहे, या संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती मात्र या परतीच्या पावसाने या आशेवर पाणी फिरवले आहे.
आत्ता ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती, त्या शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला झाकताना मोठी तारांबळ उडाली. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात काढून टाकले आहे त्याला कोंब फुटत आहेत.
काहींना मजुराअभावी सोयाबीन पीक काढता आले नाही. त्यामुळे शेतातच असलेल्या या वाळलेल्या सोयाबीन शेगांना या पावसामुळे कोंब फुटत आहे. परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली. शेतात सोयाबीनची काढणी सुरू असल्याने मोठी तारांबळ उडाली. विजेचा लखलखाट व मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पावसामुळे भीतीदायक वातावरण झाले होते. शेतातील काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंज्यांमध्ये परिसरात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या प्रवासात पावसाने हाहाकार केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.