नारायणगाव (ता. जुन्नर) – येथील पाटबंधारे विभागातील अधिकारी सातत्याने गैरहजर असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता अंतर्गत एकूण १८ कार्यालय काम करीत आहेत. या प्रत्येक कार्यालयात एक डेप्युटी इंजिनिअर, चार सेक्शन इंजिनिअर, लेखनिक, शिपाई, ड्रायव्हर,चौकीदार कर्मचारी काम करीत असतात. परंतु कार्यालयात प्रत्यक्ष फक्त एखादाच अधिकारी उपस्थित असल्याचे आढळून येते. अनेक वेळा बाकीचे अधिकारी अनुपस्थित असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी कार्यालयात येत असतात. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांची भेट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होते. अधिकारी न भेटल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे शेतकऱ्यांना पाणीपट्टीचा अहवाल कळत नाही, शेताच्या शेजारी असलेला कॅनॉल व नदीपात्रा मुळे होणारे नुकसान अधिकाऱ्यांना कळवता येत नाही. कळवले तरी तोडगा निघत नाही. शेतकऱ्यांना पाणीपट्टीचा हिशोब दरवर्षी मिळणे गरजेचे असताना अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे शेतकऱ्यांना मिळत नाही, कॅनॉलच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या अडचणी, जाण्या-येण्यासाठीचा रस्ता व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याची काळजी घेतली जात नाही.
कॅनॉलला सोडलेले पाणी शेवटपर्यंत शंभर टक्के जात नाही. वेळोवेळी कॅनॉलची डागडुजी केली जात नाही. कॅनॉल लिकेज असल्यामुळे पाणी कॅनॉलच्या बाजूला जिरत असते. अशा अनेक समस्या घेऊन शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु संबंधित अधिकारी कामासाठी बाहेर असल्याचे सांगितले जाते.
यासंबंधी फोनवरून कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांना विचारणा केली असता, मी स्वतः उपस्थित असल्यामुळे कामे मार्गी लागतात असे त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यकारी अभियंताचा वचक नाही का? किंवा कार्यकारी अभियंता संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. कार्यालयात जे थोडेफार अधिकारी उपस्थित असतात त्यांच्यावरच कामाचा बोजा पडलेला दिसून येतो. पर्यायाने शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी हेलपाटे घालण्याशिवाय पर्याय उरत नाही.