मुंबई – साऊथचा सुपरस्टार अल्लु अर्जुन आपल्या जबरदस्त अभिनयासाठी सर्वांनाच परिचीत आहे. त्यातच त्याचा नुकताच आलेला “पुष्पा” सिनेमा जगभरात गाजतोय. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटीहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मीका मंदाना अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. त्यातच आता अल्लु अर्जुनच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा सुरू झाल्या असून याबाबत त्याने देखील मोठं विधान केलं आहे.
अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद यांचा मुलगा असून त्याचे बन्नी, आर्या, देसमुडुरू, अला बैकुंठपुरमुलू हे चित्रपट चांगलेच गाजले. एवढच नाही तर त्याचा बैकुंठपुरमुलू या चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक येणार असून यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन हे मुख्य भूमिका साकारणार आहेत.
दरम्यान अल्लू अर्जुनला एका मुलाखतीत बॉलीवूडमध्ये काम करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, आपल्याला एका चित्रपटासाठी विचारणा झालीय. लवकरच मी हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तो पुढे म्हणाला की, साऊथमध्ये मला मुख्य नायकाच्या भूमिका सहज मिळतात. मात्र बॉलीवूड सारख्या नवीन ठिकाणी काम करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी प्रचंड साहस आणि धैर्य असावे लागते.
आपल्याला चित्रपटात केवळ मुख्य भूमिका साकारण्यात रस आहे. मात्र माझ्यासारख्या अभिनेत्याला मुख्य नायकाव्यतिरिक्त इतर भूमिका दिल्यास चित्रपटाचं नुकसान होऊ शकत, अस मत अल्लु अर्जुनने व्यक्त केलं. अर्थात त्याने केवळ मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली तरच होकार देणार असा सूचक इशाराही दिला.