पुणे – गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा एकदा करोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यासोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुण्यातही पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्यात झालेल्या कोविड आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
करोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. दरम्यान, दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु असणार आहेत. महाविद्यालयांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
राज्यात आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. सहा दिवसांपूर्वी असलेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत काल तब्बल सहापटीने रुग्णसंख्या वाढलीय. कोरोनाचा हा विस्फोट होत असताना राज्यात आणखी कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉलेज बंद करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.