पवनानगर – खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी विभाग व मंडळ कृषी अधिकारी कार्यालय काळे कॉलनीच्या वतीने पवनमावळ भागात गावोगावी भातपीक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे व रोपवाटिका गादी वाफ्यावर तयार करणे संदर्भात मोहीम राबविली जात आहे. मळवंडी ठुले येथे चारसूत्री भातप्रकल्प राबविण्यात येत आहे.
यागावात चारसूत्री पद्धतीने भातलागवड करणाऱ्या 13 प्रगतिशील शेतकऱ्यांची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. प्रकल्पातील प्रगतिशील शेतकरी प्रदीप देशपांडे व किसन ठुले यांच्याकडे भात बियाणे रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया तसेच गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करून भातपेरणी प्रात्यक्षिक कृषी सहायक विकास गोसावी, प्र. मंडळ कृषी अधिकारी तथा कृषी पर्यवेक्षक नागनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
गादी वाफे तयार करताना तळाशी 4 फूट व वाफ्यावर 3 फूट रुंदीचे आणि 8 ते 10 से. मी. उंचीचे व क्षेत्रानुसार लांबीचे बनवावेत. एक भात लागवडीची चार गुंठ्याची रोपवाटिका पुरेशी होते. भाताच्या तुसाची राख रोपवाटिका तयार करताना मातीत मिसळली तर रोपांना सिलिकॉन उपयुक्त अन्नद्रव्य मिळते व रोपे निरोगी जोमदार येतात.
मळवंडी येथे गादी वाफ्यावर पेरणी करताना प्रगतिशील शेतकरी प्रदीप देशपांडे, अर्जुन पवार, जयश्री पवार, मानसी देशपांडे, ज्ञानेश्वर ठुले, छबन शिंदे, अनंता बेनगुडे, निवृत्ती ठुले, अमोल बेनगुडे, किरण पवार, राज पवार, मारुती बेनगुडे, नचिकेत भालेराव, दत्तात्रेय तोंडे, प्रथमेश देशपांडे उपस्थित होते.
खतांची मात्रा कशी द्यावी
गादी वाफा एक गुंठा क्षेत्रासाठी एक किलो युरिया,3 किलो सिंगल सुपर फॉसफेट, 85 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 15:15:15 ही खताची मात्रा द्यावी.रोपवाटिका तण नियंत्रण करण्यासाठी गादी वाफे पावसाने ओले झाल्यावर व बियाणे उगवण्यापूर्वी गोल या तणनाशकाची एक मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोपे 21 दिवस वयाची झाली की पुनरलागवड करावी असे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले.
गादीवाफा रोपवाटिकेचे फायदे
रोपवाटिकेत तण नियंत्रण व आंतरमशागत करणे सोपे जाते.
जमिनीच्या वर वाफ्याला उंची असल्यामुळे रोपांच्या मुळाजवळ हवा खेळती राहते. त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते.
पाण्याची पातळी समप्रमाणात राहते. त्यामुळे रोपे तजेलदार व जोमदारपणे वाढतात.
रोपवाटिकेतील रोपांसाठी खत व्यवस्थापन व कीड रोग नियंत्रण करणे सोपे जाते.
रोपांच्या पुनरलागवडीसाठी गादी वाफ्यावरून रोपे सहज काढता येतात.