सोमेश्वरनगर : (विनोद गोलांडे) – सोमेश्वरनगर येथील शेतकऱ्याने मेहनतीने पिकविलेले टरबूज व कलिंगड व्यापाऱ्यांना कमी दरात न विकता स्वत: गावोगावी जाऊन विकणे सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेला खर्च तरी मिळावा या हेतूने शेतकरी गावोगावी जाऊन विक्री करीत आहे.
लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकताना कसरत करावी लागत आहे. या संधीचा लाभ घेत व्यापारीही कमी दराने शेतमाल खरेदी करीत आहेत. प्रशांत कोरडे मुरूम (ता . बारामती) येथील शेतकऱ्याने आणि कलिंगड व्यापाऱ्यांना कमी दरात न विकता स्वत: गावोगावी जाऊन विकणे सुरू केले आहे.
बारामती तालुका उसबगायत पट्टा म्हणून ओळखला जात असला तरी काही शेतकरी मात्र यावर्षी रब्बी हंगामाकडे वळलेले असून बऱ्याच शेतक-यांनी कलिंगड ,टरबूज-खरबूज लागवड केलेली आहे. परंतु लॉकडाउनमुळे आठवडे बाजार व बाजारपेठ बंद असल्याने शेतीमालाची विक्री होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
बाजार बंद असल्यामुळे व्यापारी शेतमालाची कमी दरात मागणी करीत आहेत. त्यामुळे कलिंगड,टरबूज-खरबूज कसे विकावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. परंतु, अशाही बिकट परिस्थितीत सापडलेल्या मुरूम येथील प्रशांत कोरडे यांनी कोणत्याही व्यापाऱ्याला पीक विक्री न करता स्वत: आजूबाजूच्या गावात जाऊन आणि नियमांचे पालन करत विक्री करत आहे. जरी परवडत नसले तरी स्वतः विक्री केल्यामुळे झालेल्या खर्च तरी मिळवा या अपेक्षेने शेतकरी गावो-गावी जाऊन आपल्या शेतमालाची विक्री करीत आहेत.