दौंड – तालुक्यात पावसाळ्यात पडलेल्या सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त पाऊस एकाच महिन्यात पडल्यामुळे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील 14 हजार 204.80 हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. यातील 4 हजार 873.10 हेक्टरवरील पेरणीचे नुकसान झाले असून, अंदाजे 7 हजार 503 शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसल्याची शासकीय अहवालात नोंद आहे.
सध्या ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भाजीपाला आणि फळपिके यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरू आहेत. दौंड तालुक्याची ओळख बागायती तालुका म्हणून आहे, त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. सध्या नुकतीच उसाची लागवड केलेल्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र याचा पंचनामा होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत असून, त्याला उसाची दुबार लागवड करण्याची वेळ येणार असूनही कोणतही अनुदान किंवा मदत त्या शेतकऱ्याला मिळणार नसल्याने त्याच्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ऊस लागवड करताना शेतकरी दुहेरी पीक म्हणून उसातच कांदा, भाजीपाला अशी पिके घेत असतात; या अंतरपिकांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत असूनही, हे नुकसान उघड्या डोळ्यांनी बघण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आले आहे.
मागील वर्षी सरासरी पाऊस कमी पडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले. या वेळचा दुष्काळ खूप मोठा होता. त्यावेळी शेतकऱ्यांना आता तरी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. ऐन पावसाळ्यात म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत दौंड तालुक्यात 312.75 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यात पावसाची सरासरी 450 मिलिमीटरची आहे. मात्र दुष्काळानंतर पडलेल्या पावसाळ्यातही ती सरासरी ओलांडली गेली नाही. यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाची दौंड तालुक्यात 198.25 मिलिमीटर नोंद झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यात पावसाची जेवढी सरासरी होती, त्या सरासरीच्या निम्म्यापेक्षाही जास्त पाऊस एकाच महिन्यात झाला असल्याने सुरुवातीलाच पडलेला दुष्काळ आणि नंतर परतीचा पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. एकंदरीतच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे सुरू असलेल्या पंचनाम्यांमुळे काही शेतकरी समाधानी आहेत, मात्र ऊस उत्पादक शेतकरी असमाधानी आहे.