हडपसर – भारतीय किसान संघाचे संस्थापक सदस्य तसेच किसान संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली सादबा तुपे यांचे नुकतेच निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे हे त्यांचे पुत्र होत. भारतीय किसान संघाच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात १९७४ मध्ये सुरू झालेल्या राज्याच्या कार्यात माऊली तुपे यांचे सक्रिय योगदान राहिले. लहानपणापासून ते स्वयंसेवक होते. संघात त्यांनी तालुका स्तरापर्यंत जबाबदारी पार पाडली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे तुरुंगवास भोगला.
आणीबाणी नंतर त्यांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत होती. परंतु माऊली तुपे यांनी किसान संघाचे काम करायचे ठरवले आणि ते शेवटपर्यंत पूर्ण केले. मेहनती आणि मृदुभाषी असलेल्या माऊली तुपे यांची शेतकऱ्यांप्रति प्रचंड संवेदनशीलता होती. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन संघर्षासाठी ते सदैव तयार होते. त्यांनी जनसेवा सहकारी बँकेत संचालक म्हणुनही काम केले.
किसान संघाच्या कामानिमित्ताने महाराष्ट्रभर सतत भ्रमंती, संपर्क व त्यामाध्यमातून सर्व स्तरातील शेती विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यात प्रयत्नशील राहिले. सन २००१ च्या ३८ गावे पालिकेतून वगळण्यासाठी केलेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. गाव पातळीपासून ते मुंबईपर्यंत, तलाठ्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत, बांधापासून ते मार्केट कमिटीपर्यंत शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देऊन ते सत्वर सक्रियतेने समस्यांना आवाहन देत असत. त्यांच्यारुपाने शेती क्षेत्रासाठी व शेतकऱ्यांसाठी एक आधारवड लाभला होता. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना भारतीय किसान संघाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.