बीड – गळीतास ऊस गेल्याने पेटवून दिलेल्या ऊसाच्या फडात झोपलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना श्रीराम वस्ती (ता.गेवराई) येथे घडली आहे. दिगांबर विक्रम पांढरे (वय 27) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिगांबर हे शुक्रवारी (ता.19) काम करून घरी आले होते. त्यानंतर त्यांना फोन आल्याने ते घराबाहेर गेले ते पुन्हा परत आलेच नाहीत अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. रात्रभर घरी न आल्याने दिगांबर यांचा शोध घेतला असता, जाधव यांच्या उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.
जाधव यांचा ऊस गळीतास गेला होता. त्यामुळे त्यांनी फडातील पाचरट पेटवून दिले. याच फडात दिगांबर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शनिवारी सकाळी मृतदेह जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला असता हा घातपात असून खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली.
दिगांबर पांढरे यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. दिगांबर यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. आता त्यांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून कुटुंब उघड्यावर पडले आहे. याप्रकरणी अधिक तपास तलवाडा पोलिस करत आहेत.