मुंबई – महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. मात्र यानंतर नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता, असे अजित पवार यांनी वक्तव्य केले होते.
यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा म्हटले की, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ दिली नाही. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवडणूक घेऊ नका यासाठी दिल्लीतून त्यावेळी निरोप होता, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. ते तिकडे शिवसेनेतून उरलेले आमदार कसे अपात्र होतील याविषयी प्रवचन करत आहेत. परंतु नार्वेकरांचा पक्षांतरचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्यांचा छंद असून पक्षांतराला उत्तेजन देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही.
आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे एवढेच त्यांना सांगतो आहोत. नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवायला लागेल. ही धमकी नाही. नाहीतर परत ते म्हणतील आम्ही धमकी दिली. कायद्याचे पालन करा हे आम्ही सांगत आहोत. परंतु पक्षांतराला उत्तेजन देऊन तुम्ही लोकशाही आणि स्वातंत्र्याची हत्या करत आहात आणि ती आम्ही होऊ देणार नाही, असे दम राऊत यांनी नार्वेकरांना दिला.