मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन मृत्यू आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणांमुळं राज्याच्या राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडीला सतत धारेवर धरले जात आहे. फडणवीसांनी या प्रकरणाची गुप्त माहिती आपल्याकडे असल्याचे सांगत सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला होता. त्याला आता राष्ट्रवादीने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप ट्विट करून केला आहे. ट्वीटमध्ये म्हटलं की ‘देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत’. असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— NCP (@NCPspeaks) March 18, 2021
मागील काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रीमंडळात मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यात गृहमंत्री बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. पूजा चव्हाण आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे असलेलं गृहखातं काढून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादीने फडणवीसांवर केलेला हल्लाबोल म्हणजे गृहमंत्र्यांची पाठराखण असल्याचं बोलल जात आहे.