नवी दिल्ली – कोविड-19 ची चाचणी सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी म्हणून तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या फिरत्या आय-लॅबचे (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. देशातील दुर्गम, अंतर्गत आणि सुलभ दळणवळणाचे मार्ग नसलेल्या भागात ही प्रयोगशाळा तैनात केली जाईल आणि प्रति दिन 25 कोविड-19 आरटी-पीसीआर चाचण्या, दररोज 300 एलिसा चाचण्या, क्षयरोग, एचआयव्ही इत्यादींसाठी अतिरिक्त चाचण्या घेण्याची तिची क्षमता आहे. कोविड नियंत्रण धोरणाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ही संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 7,390 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1 लाख 94 हजारापेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.96 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या 1 लाख 60 हजार 384 संक्रमित रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
शासकीय प्रयोगशाळांची संख्या 699 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 254 पर्यंत वाढली आहे. एकूण 953 प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी केली जात आहे. गेल्या 24 तासात 1 लाख 65 हजार 412 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 62 लाख 49 हजार 668 नमुने तपासण्यात आले आहेत