टास्क फोर्सच्या सादरीकरणात 25 लाख जणांना उपचाराची गरज व्यक्त
मुंबई – राज्यात करोनाची तिसरी लाट आल्यास त्यात किमान 50 लाख जणांना संसर्ग होण्याची अटकळ राज्याच्या आरोग्य खात्याने बांधली आहे. त्यातील किमान 25 लाख जणांना शासकीय रुग्णालय आणि करोना केंद्रात उपचार करावे लागतील, असेही अनुमान काढण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकारचे काटेकोर नियोजन सुरू आहे. यात लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असल्याने औषधे आणि उपचारांच्या सोयी युद्धपातळीवर तयार करण्यात येत आहेत.
तिसऱ्या लाटेत सक्रिय बाधितांची सर्वाधिक संख्या आठ लाख असेल, असा अंदाज असून त्यापैकी चार लाख जणांना उपचाराची गरज भासू शकते. या 50 लाख बधितांमध्ये पाच लाख बालके असण्याची शक्यता असून त्यातील अडीच लाख जणांना उपचाराची गरज भासू शकते. त्यापैकी साडेतीन टक्के म्हणजे आठ हजार 740 बालकांना बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे लागतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आलेल्या या आढाव्यात या माहितीचा समावेश आहे. आणखी दोन तीन सादरीकरणाचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेच्या नेमकेपणाने अंदाज येऊ शकेल. मात्र टास्क फोर्सने सुचवल्याप्रमाणे आम्ही तयारी सुरू केली आहे, असे राज्याचे आरोग्य आयुक्त एन. रामस्वामी यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेत 40 लाख जणांपेक्षा अधिक संसर्ग होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र, आम्ही 50 लाख जणांवर उपचार करता येतील अशी उपाययोजना करत आहोत. पहिल्या लाटेत 19 लाख जणांना संसर्ग झाला. तर दुसऱ्या लाटेत 40 लाख जणांना संसर्ग झाला.
विषाणूची नवी आवृत्ती समोर येत असल्याने त्याबाबतचा अंदाज बांधणे कठीण आहे. आम्ही तयार आहोत… मात्र तिसरी लाट येईल का याची कल्पना नाही, असे वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी सांगितले.
राज्याच्या आरोग्य विभागाने एक हजार 676 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला आहे. त्यात 782 कोटी करोनावरील आवश्यक औषधांच्या खरेदीसाठी तर 893 कोटी सौम्य आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या करोना बाधितांवरील नव्या औषधांच्या खरेदीचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सादरीकरणात आवश्यक औषधे आणि चाचणी किटबाबतही भाष्य करण्यात आले.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 24 जूनपर्यंत रेमडेसिविरचे सहा लाख 90 हजार डोस देण्यात आले. तर तिसऱ्या लाटेत आठ लाख डोस लागण्याची शक्यता आहे.