– देवयानी देशपांडे
मृतांची प्रतिष्ठा! कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांना प्रतिष्ठा आणि मानवी हक्क नसतील? प्रस्तुत लेखाचा विषयच डोके आणि मन सुन्न करणारा आहे; परंतु “कमजोर दिलवाले इसे न पढे’ असे काही म्हणता येणार नाही. तसे केले तर आपण वास्तव अमान्य करतोय, असे होईल.
कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान माध्यमांतून धडकणाऱ्या मृत्यूच्या बातम्या मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. वास्तव मात्र त्याहीपेक्षा भयंकर होते. दिल्लीमध्ये कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लहानग्यांना पुरण्यासाठी, अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नव्हती. काही ठिकाणी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकूड आणि जागा उपलब्ध नव्हती. उत्तर प्रदेशात मृतदेह घाटांवर रचून ठेवण्यात आले. “पावसाळा सुरू झाला की न जाणो नदीच्या प्रवाहाने कधीही मृतदेह वाहून आमच्या दारात येतील’ अशी भीती तेथील स्थानिक आजही वर्तवत आहेत.
भारतातील अनेक राज्यांतील वेगवेगळ्या शहरांची, गावांची हीच कथा होती. काही ठिकाणी तर अक्षरशः प्रेतांचे ढिगारे करून जाळावे लागले. या आणि अशा असंख्य बातम्या कानी पडत असताना अनेकांच्या बोलण्यात येत होते की, माणसाच्या आयुष्याला काही किंमतच उरली नाही. जीवन स्वस्त झालेय, असे वाटणे अत्यंत साहजिक होते आणि हे वास्तवदेखील होते.
न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने मे 2021 अखेरीस प्रसिद्ध केलेल्या “जस्ट हाऊ बिग कुड बी इंडियाज डेथ टोल बी?’ या अहवालातून भारतामध्ये मे अखेरपर्यंत कोविडमुळे 3.07 लाख मृत्यू झाले अशी माहिती पुढे आली. प्रत्यक्षात हा आकडा आणखीही मोठा असू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. इस्पितळात जागा नसल्याने, विशेषतः ग्रामीण भागात घरातच बहुतांश मृत्यू झाले, असे या अहवालात म्हटले आहे.
शिवाय, काही कुटुंबीयांनी आपल्या प्रियजनांचा कोविडने मृत्यू आला हे सांगण्यास संकोच वाटणे हे देखील मृतांच्या आकड्यांबाबत खात्री नसल्याचे कारण आहे. हा कोविड महामारीचा काळ होता. उपरोक्त कारणे लक्षात घेऊन भारतातील प्रत्यक्ष मृत्यू माहिती आहेत त्यापेक्षा दुप्पट असावेत, असे या अहवालात नमूद केले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रकृतीचे अक्राळविक्राळ, भयावह रूप आपण अनुभवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
“महामारी’ म्हणजे काय असते हे आपण अक्षरशः अनुभवले. अमुक एका साथीच्या रोगामुळे पूर्वी माणसे किड्यामुंग्यांसारखी मरत असत, हे आपण पूर्वीच्या पिढीतील माणसांकडून ऐकले होते ते आता पाहिले आणि अनुभवलेही! आपण हा काळ जगलो हे सुदैव की दुर्दैव?
जीव जन्माला येतो तो आपली प्रतिष्ठा घेऊन आणि समाजाचा भाग म्हणून त्या जीवाला बाह्य प्रतिष्ठा दिली जाते. म्हणजे पाहा, आपण जिवंत आहोत ही मुळात प्रतिष्ठेची बाब! अशावेळी, मृत व्यक्तीची प्रतिष्ठा किंवा “मरणोत्तर प्रतिष्ठा’ ही संकल्पना मात्र दुर्लक्षिली जाते.
तुम्ही म्हणाल व्यक्तीची मरणोत्तर प्रतिष्ठा? असे खरेच काही असते? होय! जवळजवळ जगभरात सर्वत्र जिवंत माणसे मृत व्यक्तीचा आदर करतात. मानववंशशास्त्राचा अभ्यास याचे अनेक पुरावे दर्शवतो. मृत व्यक्तीला प्रतिष्ठा आहे, असे जगभरात सर्वत्र सर्व संस्कृतींमध्ये मानले जाते.
पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासकांना देखील अंत्यविधीशी संबंधित काही पुरावे सापडले आहेत. कोविडच्या काळात अनेकांचे अंत्यविधीदेखील करता आले नाहीत. अशावेळी मरणोत्तर प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित होतो.
मृत व्यक्तीला मानवी हक्क असू शकतात? हा दुसरा प्रश्न! तर ते जीवित नाहीत म्हणून त्यांचे हक्क किंवा कर्तव्ये असू शकत नाहीत आणि त्यांचे मानवी हक्कदेखील असू शकत नाहीत; परंतु जीविताची मृतांप्रती कर्तव्ये असतात? तर होय! कारण मृत व्यक्तीला मरणोत्तर प्रतिष्ठा असल्याने त्यांचा आदर होणे अत्यावश्यक असते. मग जीवितांची मृतांप्रती कोणकोणती कर्तव्ये असावीत?
जगभरात हा अभ्यासाचा विषय आहे. प्रा. आंतून-दे-बात्स यांच्यासारखे इतिहासतज्ज्ञ या विषयाचा अभ्यास करत आहेत. मानव आणि वस्तू यांच्या मधोमध मृत व्यक्तीला विशेष स्थान आहे; मृत आणि जीवित व्यक्तींचा मिळून एक “नैतिक समुदाय’ आहे यामध्ये जीविताचे हक्क, कर्तव्ये आणि मृतांचे संरक्षण असे काही मुद्दे अभ्यासले जात आहेत.
गेल्या संपूर्ण वर्षभरात आपण कोविडमुळे आलेल्या परिस्थितीत मानवतेचा मुद्दा लावून धरला आहे. अशावेळी भेदभाव बाजूला सारून जगभरातल्या राष्ट्रांनी परस्परांना सहाय्य केले. असे असताना आपण मरणोत्तर प्रतिष्ठेचा मुद्दा दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. आता अशावेळी जीवाला किंमत नाही, असे म्हणून आपण केवळ हळहळ व्यक्त करायची? की मृतांवर अंत्यसंस्कार करता आले नाही, व्यवस्था अपुरी पडली म्हणून दोषारोप करत राहायचे?
तर हे दोन्ही उपाय तात्पुरते वाटतात. दिवसागणिक इतके मृत्यू होतील अशी कल्पनादेखील करता येत नाही. पण ते आपण भोगले. ज्यांच्यावर असे प्रसंग गुदरले त्यांच्या मनावर आयुष्यभराचे ओरखडे उमटले. मरणोत्तर प्रतिष्ठा जपायची असेल, तर भारताने लोकसंख्या धोरणावर काम करणे ही काळाची गरज आहे.
कोविडच्या काळात मृत्यूचे तांडव झाले. जीवाला किंमत नाही असे वाटले पण जन्मदेखील साजरे करता आले का? तर नाही. या काळात खरेतर नव्याने मूल जन्माला न घालण्याचा किंवा निर्णय पुढे ढकलणाऱ्या जोडप्यांचे आपण आभार मानले पाहिजे. सामाजिक चौकटीतून बाहेर पडून खरेच मानवतेचा विचार करायचा असेल, तर पावले सांभाळून उचलावी लागतील.
विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नीट विचार केला असता, इतर देशांशी तुलना करून मग आपण कसे कमी पडलो वगैरे चर्चांचे मूळ लोकसंख्या वाढीतच सापडते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे मरणोत्तर प्रतिष्ठा जपण्याचे व्रत कोणा एकाचे नाही तर सामूहिक स्वरूपाचे आहे.
स्वभावानुसार माणूस भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करतो आणि भविष्याचा प्राधान्याने विचार करतो. महामारीच्या या भयावह परिस्थितीत प्राण गमावलेल्यांची वृत्ते ऐकून माणूस सुन्न झाला. जीव जन्माला आला तरी तो प्रसंग साजरा करता येणार नाही अशी परिस्थिती आपणच आपल्यावर ओढावून घेणे योग्य नाही.
निसर्गचक्र अव्याहत चालत राहणार आहे; परंतु आपण निसर्गाच्या कलाने घेतलेच पाहिजे; शेवटी आपण निसर्गाचाच तर अंश आहोत. अशावेळी लोकसंख्या नियंत्रण या मुद्द्यावर टोकाची नव्हे, पण सम्यक विचारांती काही भूमिका घेणे ही काळाची गरज आहे.