करोनासह अनेक विषयांवर “ज्ञान’ देणारे असंख्य संदेश तुम्हाला रोज सोशल मीडियावरून येत असतात. करोनाची दुसरी लाट हा देशात सुरू असलेल्या फाइव्ह-जी नेटवर्कच्या चाचणीचा परिणाम होता, असे दूरसंचार विभागाचा एक अधिकारी आपल्या एका नातेवाइकाला फोनवरून सांगत आहे, असा ऑडिओ कदाचित तुमच्या ऐकण्यात आला असेल.
ही अत्यंत गोपनीय चर्चा असून, लोकांच्या हितासाठी आडमार्गाने ती रेकॉर्ड करून सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे, असेही या ऑडिओसोबतच्या संदेशात म्हटले होते. या कथित लीक ऑडिओमध्ये अधिकारी असे सांगताना आढळतो की, फाइव्ह-जी नेटवर्कची चाचणी जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत करोनाचे रुग्ण वाढत जातील आणि जसजसे चाचणीचे काम संपेल तसतशी रुग्णांची संख्याही कमी होत जाईल.
पाश्चात्य देशांमध्येही फाइव्ह-जी नेटवर्कमुळेच करोनाची लाट आली होती, असेही हा अधिकारी सांगताना ऐकायला मिळते. या नेटवर्कबाबत अशा अफवा केवळ आपल्या भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये पसरविल्या जात आहेत. भारतात मोबाइल आणि इंटरनेट नेटवर्क फोर-जीपर्यंत पोहोचले आहे आणि फाइव्ह-जीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु अमेरिका, युरोप, चीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशांत हे नेटवर्क आधीच सुरू झाले आहे.
फाइव्ह-जी नेटवर्क जुन्या मोबाइल नेटवर्कबाबत काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. उदाहरणार्थ, फाइव्ह-जी नेटवर्कमुळे कर्करोग होण्याची शक्यता तर वाढणार नाही ना? परंतु ही शंका शास्त्रीय आधारावर टिकू शकली नाही. 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, मोबाइल फोनच्या वापराचा कोणताही प्रतिकूल परिणाम सध्या तरी मानवी आरोग्यावर झाल्याचे दिसत नाही. मोबाइल फोनमधून निर्माण होणाऱ्या तरंगांमधून कर्करोग होण्याची शक्यता असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.
गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये एक फेक न्यूज व्हायरल होत होती. फाइव्ह-जी टॉवरच्या कारणाने करोना विषाणू वेगाने पसरत आहे, अशी ती बातमी होती. त्याचा परिणाम असा झाला की, काही लोकांनी मोबाइल टॉवर्सना आगी लावल्या. भारतातही जेव्हा अशा अफवा पसरल्या, तेव्हा त्या निराधार आहेत हे सांगणे सरकारला भाग पडले. परंतु फेक न्यूजच्या आधारावर एखाद्या सेलिब्रिटीने जर थेट न्यायालयात खटला दाखल केला, तर चिंता अधिक वाढते.
चित्रपट अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात फाइव्ह-जी नेटवर्कच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका तर फेटाळलीच; शिवाय न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी जुही चावला यांना 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही याचिका लोकप्रियता मिळविण्यासाठी केली असावी, असे वाटते. वस्तुतः जुही चावला यांनी सुनावणीची ऑनलाइन लिंक सोशल मीडियावर तीन वेळा शेअर केली.
त्यामुळे न्यायालयाच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण झाला. या लिंकच्या मदतीने एकाने तर कार्यवाही सुरू असताना जुही चावला यांच्या चित्रपटातील गाणे म्हणायला सुरुवात केली. जुही चावला यांच्यासोबत असलेले वीरेश मलिक आणि टीना वाच्छानी या अन्य दोन याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, फाइव्ह-जी नेटवर्क किती सुरक्षित आहे, याची तपासणी करण्याचे आदेश सरकारने संबंधित यंत्रणेला द्यावेत.
या याचिकेत तीसपेक्षा अधिक सरकारी आणि बिगर सरकारी संस्था आणि संघटनांना वादी करण्यात आले होते आणि अशी विनंती करण्यात आली होती, की जोपर्यंत फाइव्ह-जी तंत्रज्ञान सुरक्षित आहे याची सरकारने पुष्टी करेपर्यंत या तंत्रज्ञानाला स्थगिती देण्यात यावी.
उच्च न्यायालयाने सरकारला निवेदन देण्यापूर्वी थेट न्यायालयात फाइव्ह-जी तंत्रज्ञानाला आव्हान दिल्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने म्हटले की, जुही चावला आणि अन्य व्यक्तींनी आपली चिंता आधी सरकारकडे व्यक्त करायला हवी होती आणि तिथे नकार दिला गेला असता तरच न्यायालयात यायला हवे होते. करोनाकाळात आपण एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवली आहे, ती म्हणजे सोशल मीडियावरून अनेकांनी करोनाविषयी ज्ञान पाजळले आहे.
सोशल मीडिया इतका प्रभावी आहे की, त्याने अनेकांना तज्ज्ञच बनवून टाकले आहे. सोशल मीडियावर अशा अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात, ज्यात करोना बरा झाल्याचा दावा करण्यात येतो; परंतु अशा प्रसाराला बळी पडल्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपण सुरक्षित असल्याची खोटी भावना आरोग्य समस्या आणखी गंभीर बनविणारी ठरते, असे डॉक्टरांचे मत आहे.
आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात असलेल्या कृष्णपटनम गावात करोनावरील “चमत्कारी आय ड्रॉप’ मिळत असल्याची बातमी सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली होती आणि या ड्रॉपसाठी गावात मोठी गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. व्हायरल व्हिडिओत असा दावा करण्यात आला होता की, आयुर्वेदिक डॉक्टरांनी तयार केलेले हे ड्रॉप्स डोळ्यात घातल्यावर अवघ्या दहा मिनिटांत करोना बरा होतो आणि शरीरातील ऑक्सिजनचा स्तर सामान्य होतो. या बातमीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता,
त्यात आय ड्रॉप घेतल्यानंतर दहा मिनिटांच्या आत एक निवृत्त मुख्याध्यापक करोनातून पूर्णपणे बरा झाल्याचा दावा करण्यात आला होता. माध्यमांनी काही दिवसांनी संबंधिताचा करोनाने मृत्यू झाल्याचीच बातमी दिली; परंतु ती व्हायरल झाली नाही. काहीजणांनी दारूपासून बनविलेल्या काढ्याच्या मदतीने तर काही व्हिडिओंमधून असा दावा करण्यात आला की, शरीराला गोबर आणि गोमूत्राचा लेप दिल्यामुळे करोनापासून संरक्षण होते.
रोगप्रतिकार शक्ती वाढते. हा संदेश व्हायरल होताच गुजरातमधील गोशाळांमध्ये नागरिकांची नुसती झुंबड उडाली. एका मेसेजमध्ये असे सांगितले जात आहे की, पुद्दुचेरी येथील रामू नावाच्या विद्यार्थ्याने कोविड-19 वर घरगुती उपचार शोधून काढला आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याला स्वीकृती दिली आहे.
काळी मिरी, मध आणि आले यांचे सेवन पाच दिवस केले तर करोनाचा प्रभाव शंभर टक्के कमी करता येतो, असे या विद्यार्थ्याने सिद्ध केले असल्याचे या संदेशात म्हटले होते. तथापि, खुद्द ज्या विद्यापीठात रामू शिकतो, त्या विद्यापीठाला यासंदर्भात गंधवार्ताही नव्हती, असे समोर आले. सांगण्याचे तात्पर्य असे की, व्हॉट्सऍपवरून मिळणारे “ज्ञान’ किमान एकदा तपासून तरी पाहायलाच पाहिजे.