कोलकाता – कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण किनाऱ्यावरील हरिदेबपूर येथून तीन संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. पुढे चौकशी केली असता ते जेएमबी या अतिरेकी संघटनांचे संचालक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
या अतिरेक्यांची नजीउर रहमान पावेल, मेकैल खान आणि रबीउल इस्लाम अशी नावे आहेत. या तीनही अतिरेक्यांनी योग्य संधी साधत बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली होती. विशेष म्हणजे ते कोलकात्यातील एका हायप्रोफाईल भागात राहत होते, अशी देखील माहिती त्यांच्या चौकशीतून समोर आली.
भारतात घुसरखोरी करुन हायप्रोफाईल परिसरात राहणारे अतिरेकी हे देशातील बेरोजगार तरुण-तरुणांना हेरायचे. ते त्यांचे ब्रेनवॉश करायचे. विशेष म्हणजे ते प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन चॅट करुनही तरुण-तरुणींचे ब्रेनवॉश करायचे. त्यानंतर ते या तरुणांची अतिरेकी संघटनेत भरती करायचे. या गोष्टीवर अधिकाऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
भारतात घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना आपली ओळख लपविण्यासाठी लग्न हे सोपं माध्यम ठरले आहे. या माध्यमातून त्यांना भारताचा नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोठी मदत होते. तसेच स्थानिक पातळीवर रुळण्यास मदत होते. त्यामुळे लग्न हे त्यांचे एकप्रकारे सुरक्षा कवच बनते. ते आपले नाव बदलून व हिंदू नाव धारण करून येथील स्थानिक महिलांशी लग्न करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.