श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – एक वर्षापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. हे प्रेमसंबंध दोघांच्या घरी कळले अन् त्या दोघांनी चक्क रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना महादेववाडी (लोणीव्यंकनाथ ता. श्रीगोंदा) परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत श्रीगोंदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजू बाबा कोळपे (वय 37) व राणी राजेंद्र साबळे (वय 30, दोघे रा. येळपणे, ता. श्रीगोंदा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. राजू व राणी या दोघांचे मागील एक वर्षापासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. त्याची माहिती दोघांच्याही घरच्यांना काळाले. त्यामुळे या प्रेमीयुगुलाने आज पहाटेच्या सुमारास नगर-दौंड लोहमार्गावर लोणी व्यंकनाथ शिवारातील महादेववाडीजवळ रेल्वेखाली उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.
याबाबत बापू कोळपे यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमित माळी यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत पुढील सूत्रे वेगाने फिरवली.