पुणे – महसूल मंडळ, कृषी मंडळाच्या धर्तीवर विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी मध्यवर्ती असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कामकाजाला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत काही दिवसांपूर्वी आदेश देऊन नागरिकांच्या सोईसाठी क्षेत्रिय कार्यालय सुरू करण्यास सांगितले होते. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतीचे मध्यवर्ती ठिकाण निवडण्यास सांगण्यात आले असून, दळणवळणाच्या सुविधा असलेल्या ठिकाणाला प्राधान्य देण्यात आले. याशिवाय त्या कार्यालयाच्या भागातील ग्रामपंचायत भेटी आणि मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
दरम्यान, ग्रामसेवकांना मुख्यालय सोडून तालुका, जिल्हास्तरावरील सभांसाठी उपस्थित राहावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील उपस्थितीवर परिणाम होतो. ग्रामपंचायत स्तरावरील विविध विवाद, तक्रार अर्ज, चौकशी, अपील अर्ज सुनावणी, विविध योजना अंमलबजावणी, विकासकामांचे प्रस्ताव सादर करणे, विविध माहिती अहवाल प्राप्त करून घेणे आणि इतर कामे करण्यासाठी स्थानिक नागरिकांना पंचायत समिती स्तरावर यावे लागते.
आता, विस्तार अधिकारी आठवड्यातील एक किंवा दोन दिवशी ग्रामपंचायतीत उपस्थिती लावणार असून, इतर दिवशी पंचायत समितीत उपस्थित राहणार आहेत.