मंतरवाडी-कोंढवा मार्गाचे कॉंक्रिटीकरण नाही; वाहतूक कोंडीत खड्डे, धुळीची भर
– महादेव जाधव
कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम बंद पडले असून जागोजागी खड्डे, दगडगोटे व धुळीमुळे दररोज वाहतूक कोंडी आणि त्यातून जीवघेणे अपघात होत आहेत, असे असताना या रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी आणखी किती बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी पाहणार, असा संतप्त सवाल वाहनचालक व नागरिकांनी केला आहे. तर, या कामासाठी निधीची तरतूदच नव्हती, यामुळे काम बंद असल्याचे बांधकाम खात्याचे अधिकारी सांगत आहेत.
मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी चौकापासून काही अंतरावर कॉंक्रिटीकरणाचा रस्ता जेथे सुरू होतो तेथे वाहने वर जाण्यासाठी दगडगोटे टाकून भराव केला आहे. याच ठिकाणी दररोज अपघात घडत आहेत. हांडेवाडीच्या तीव्र चढावर दोन-दोन फूट खोल खड्डे पडले असून सर्वत्र खडी, दगडगोटे व धुळीमुळे अपघात होत आहेत. उंड्री परिसरात कलोरी सोसायटीसमोर व आंबेकर हॉटेलसमोर रस्ता पूर्णपणे उखडला आहे. पिसोळी परिसरात धर्मावत पेट्रोलपंपासमोर रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. बांधकाम विभागाच्या या कारभारामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत 20 दिवसांपूर्वीच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शेख यांनी या रस्त्याचे काम एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झालेले नाही याउलट साधे खड्डुे सुध्दा बुजविण्यात आलेले नाहीत. खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करीत सोशल मिडियावर पोस्ट केली होती, तरीही या मार्गाची दुरुस्ती झालेली नाही.
या रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद नसल्याने काम बंद पडले होते. शासनाला याबाबत कळविले असून एका आठवड्यात काम सुरू होईल. अवजड वाहतुकीचे प्रमाण मोठी असल्याने खड्डे बुजविले तरी लगेच रस्ता खराब होतो. तरीही लवकरात लवकर कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू होईल.
– धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
रस्ता पूर्णपणे उखडला असून धुळीमुळे परिसरातील रहिवासी, हॉटेलचालक व इतर व्यावसायिक हैराण झाले आहेत. या धुळीमुळे मोठे प्रदूषण होत असून नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. खड्ड्यांमुळे तर अनेक निष्पाप नागरिकांचे बळी याठिकाणी गेले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम खाते जागे होत नाही.
– हिम्मत हांडे, उपसरपंच-औताडे हांडेवाडी
गेल्या वीस दिवसांपूर्वी उंड्री व पिसोळीच्या नागरिकांनी या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन होऊन वीस दिवस उलटले तरी कोणतेही काम तर सुरू झालेले नाही. साधे खड्डे बुजवून दुरुस्तीही झालेली नाही. यावरुन सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार लक्षात येतो.
– मच्छिंद्र दगडे, सरपंच -पिसोळी
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ठेकेदाराला काम पूर्ण करता येत नव्हते तर काम घ्यायचेच कशाला. अपघातात नागरिकांचे बळी जात असल्याने अधिकाऱ्यांवरच फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत.
– अशोक न्हावले, मा.उपसरपंच-हांडेवाडी
मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम अनिश्चित काळासाठी बंद पडल्याचे दिसून येते, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने किमान ज्या-ज्या ठिकाणी रस्त्याच दुरवस्था झाली आहे. त्या-त्या ठिकाणची दुरुस्ती तत्काळ करुन वाहनचालक व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– उल्हास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
वारंवार मागणी करुनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आम्ही फावडे हातात घेत काही ठिकाणचे खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला. परंतू, सार्वजनिक बांधकाम खात्याची काहीच जबाबदारी नाही का? नागरिकांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का? बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे अनेक नागरिकांचे बळी जात आहेत.
– निवृत्ती बांदल, सरपंच, उंड्री