चेन्नई – तामिळनाडु प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ए. व्ही. नारायणन यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वावर जाहीर टीका केल्याने त्यांची आज तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
कॉंग्रेस वाचवण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आपल्या पदावरून दूर व्हावे अशी सुचना त्यांनी केली होती. ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, के चंद्रशेखर राव आदि नेत्यांनी पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतून पक्षाला उर्जितावस्था आणावी असे आवाहनही त्यांनी केले होते.
एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही वक्तव्ये केली होती. ते म्हणाले की माझे राहुल गांधी यांच्यावर प्रेम आहे, मी त्यांचा मोठा समर्थकही आहे पण त्यांच्या नेतृत्वाचा कॉंग्रेसला लाभ होंत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी आणि प्रियंका गांधी यांनी आता नेतृत्वपदावरून दूर व्हावे. सोनिया गांधी पक्षात अधिक सक्रिय झाल्यातरी कॉंग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात असे ते म्हणाले होते.