मुंबई – शिवसेनेचे नाव आणि चिन्हासाठी दोन हजार कोटी रुपयांचा विक्री व्यवहार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्या आरोपावर ते अजूनही ठाम आहेत. आज त्यांनी म्हटले आहे की, माझा आरोप पूर्ण खरा आहे आणि त्याचे पुरावेही आम्ही योग्य वेळी सादर करू, आज ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, आम्ही चिन्हाच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, तेथे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चक्क विकण्यात आले असून त्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे या आरोपावर मी अद्यापही ठाम आहे. आमचा पक्ष याचे पुरावे योग्यवेळी सादर करेल असे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांशी संबंधित एका बिल्डरनेच आपल्याला ही माहिती दिल्याचे त्यांनी काल म्हटले होते.
हा आरोप तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या याचिकेत केला आहे काय असे विचारता ते म्हणाले की त्या याचिकेत हा उल्लेख करण्याची गरज काय, ही माहिती मी माझ्या ठामपणाच्या आधारे पत्रकारांना सांगू शकत नाही काय असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, या दाव्याबद्दल त्यांच्या विरोधात नाशिक येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्या विषयी विचारले असता राऊत म्हणाले की, असल्या तक्रारींना मी भिक घालत नाही. अशा एक लाख तक्रारी जरी दाखल झाल्या तरी मी घाबरणारा नाही.