कशाला चिंता उद्यासाठी
नसावी खंत कालसाठी
आजचा दिन जगून घ्यावा
निराशेची सोडूनी काठी
उतारवयात माणसाला काठीचा आधार असतो. कारण वृद्धत्वामुळे शरीर साथ देत नाही अशा वेळी ही काठी आधार बनत असते. वृद्धत्वाचा सामना करताना ही काठी महत्त्वाची ठरत असते. परंतु आजकाल तरुणाईमध्ये अकाली वृद्धत्व आल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. आता आपल्याला एक प्रश्न निश्चितच पडेल की तरुणाईत वृद्धत्वाची लक्षणे कशी काय दिसतील? जुना काळ आणि आताच्या काळात खूप फरक दिसून येतो. जुन्या माणसांचे सरासरी आयुर्मान जास्त असायचे. ती माणसे धडधाकट व सशक्त असायची. परंतु आता अगदी पहिल्या वर्गातील मुलाला चष्मा असतो, केस पांढरे झालेले असतात. मग हे बदल म्हणजे तरुणाईतील अकाली वृद्धत्व म्हणायचे काय? तर उत्तर असेल, नाही! माझ्या या तरुणाईतील वृद्धत्वाबाबतची लक्षणे थोडी वेगळी आहेत आणि यातील मुख्य लक्षणे म्हणजे हार मानणे, हतबल होणे, निराश होणे इ.
होय हेच ते वृद्धत्व, शरीराने नाही पण मनाने स्वीकारलेले अकाली वृद्धत्व. नकारात्मक मानसिकता, अपयशाची भीती, न्यूनगंडाची भावना आणि भविष्याबाबत आकारण चिंता या गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. मुळात माणसाचे आयुष्य हे फुलाप्रमाणे असते. आधी कळी मग फूल म्हणून बहरण्याचा काळ असतो. परंतु आजकाल उद्याची चिंता ही या मनुष्यरुपी फुलांना उमलण्यापूर्वीच कोमेजून टाकत आहे. माझे कसे होणार? अमुक अमुक वय झाले परंतु मी अजून सेटल नाही, मी कसा सेटल होणार? मला सातत्याने अपयश येते माझे कसे होणार? माझ्या बरोबरीचे संवंगडी आज कुठल्या कुठे गेले आहेत माझे कसे होणार? शिक्षण, करिअर, कौटुंबिक कलह, लग्न, संतती, भीती, कर्जबाजारीपणा इ. अनेक गोष्टींबाबतची उद्याची चिंता आजच्या हतबल मनोवृत्तीला पोषक ठरत आहे. ही उद्याची चिंता माणसातील सकारात्मकता, आत्मविश्वास, कल्पकता आणि आनंदावर घाव घालीत असते.
मानसिकदृष्ट्या चिंतेने खचलेला माणूस हळूहळू शारीरिक व्याधींना बळी पडत असतो. माणसाच्या मनाच्या सामर्थ्यावर त्याच्या यशाचे आणि आनंदाचे गणित ठरत असते. अशक्त मन किंबहुना अशक्त मानसिकता शारीरिकदृष्ट्या सशक्त माणसालाही दुर्बल करीत असते. असे म्हणतात, मन के हारे हार है, मन के जीते जीत. मनोबल हे माणसाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे.
सध्याच्या आधुनिक युगात प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकणे हे देखील एक मोठे कौशल्य आहे. धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात याला मनाचा समतोल राखता येतो तोच इथे यशस्वी होतो. उद्याची चिंता, काळजी आणि भीती माणसाच्या मानसिक आणि शारीरिक अधःपतनाला कारणीभूत ठरत आहेत.
ब्रिटिश उद्योजिका हॅरीइट ग्रीन यांनी 2008 साली द गार्डियन या वर्तमानपत्रात एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी म्हटले होते की, येणारे युग हे चिंतेचे युग आहे, आणि आपण चिंतेच्या युगात प्रवेश करीत आहोत. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मनाला सशक्त करणारी सर्जरी अथवा रोबो अजूनतरी निर्माण झाला नाही. त्यामुळे उद्याच्या नाहक चिंतेत आजचा अमूल्य वेळ वाया घालविणे योग्य नाही. याचा अर्थ असा नाही की केवळ आजचा विचार करून उद्याच्या प्रश्नांना जन्म द्यावा किंवा कुणी उद्या पाहिला आहे.
उद्यासाठी चिंता करण्यात काहीच अर्थ नाही. माणसाकडे उद्यासाठी नियोजन हवे, पर्याय हवेत, ध्येय हवे आणि निर्माण केलेल्या संधी हव्यात आणि त्या संधी मिळविण्यासाठी, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस आनंदाने आणि उमेदीने जगता यायला हवा. उद्याच्या ध्येयाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आज त्याचे नियोजन हवे. उद्यासाठी दूरदृष्टी हवी. उद्या येणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी आपण सजग असायला हवे. 1939 साली प्रदर्शित मराठी चित्रपट “माणूस’ मधील शांता हुबळीकर यांनी गायलेलं गाणं आपल्याला याबाबत खूप काही सांगून जातं.
आता कशाला उद्याची बात?
बघ उडुनि चालली रात…
भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात…
आता उद्याची चिंता नकोच. आपल्या मनाला ठणकावून सांगा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजचा दिवस माझा आहे किंबहुना रोजचा दिवस माझा आहे. नव्या जबाबदाऱ्या, संधी, आव्हाने आणि नव्या अनुभवांसाठी मी नेहमी सज्ज आहे. आणि मग बघा आयुष्यातील क्षण न् क्षण तुम्हाला एक आगळेवेगळे समाधान भरभरून देण्यासाठी सज्ज असेल.
सागर ननावरे