वडगावशेरी –उन्हाळ्यात आग लागण्याच्या मोठ्या दुर्घटना घडत असतात. महापालिका हद्दीत अद्यापही अग्निशमन केंद्रांची संख्या अपुरी असल्याने याच कालावधीत अग्निशमन दलावर कामाचा प्रचंड ताण असतो. याच कारणातून आगीच्या दुर्घटनास्थळी दलास पोहोचण्यासही उशीर होतो. याच पार्श्वभूमीवर वडगावशेरी परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. परंतु, या परिसराचे सुरक्षाकवच समजले जाणारे अग्निशमन केंद्र जागा आरक्षित असूनही अद्यापही प्रशासनाच्या लालफितीत अडकले आहे. यासाठी जागा आरक्षित असूनही या केंद्रासाठी प्रशासनाच्या वतीने चालढकल केली जात आहे, त्यामुळे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
खराडीसह वडगावशेरी आणि चंदननगरचा 1997 मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. या भागाचा विस्तार मोठा असल्याने तसेच आसपास मोठी गावे असल्याने या भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी या भागातील पहिले नगरसेवक स्व. शिवाजीराव भुजबळ यांनी केली होती. त्यावेळीही अग्निशमन दलासाठीची जागा आरक्षित करण्यासाठी प्रशासनाने चालढकल केली होती. अखेर ही जागा आरक्षित करण्यात आली असली तरीही त्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
खराडीसह वडगावशेरी भागांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात आयटी कपन्या सुरू झाल्या आहेत. त्याशिवाय मोठ्या गृह निर्माण सोसायट्याही उभ्या राहिल्या आहेत. यातूनच नागरीकरण वाढले असून वर्दळही वाढली आहे. परंतु, एखादी दुर्घटना घडल्यास थेट येरवडा येथून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. यामध्ये वेळ जात असल्याने दुर्घटनेची व्याप्ती वाढत आहे. परंतु, या वास्तव स्थितीकडे दुर्लक्ष केले जात असून प्रशासनाने ही बाब गाभीर्याने घेत वडगावशेरी परिसराकरिता स्वतंत्र अग्निशमन दल सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
या भागत आयटी क्षेत्र वाढले आहे, त्याशिवाय मोठ्या गृह निर्माण सोसायट्याही उभ्या राहिल्या आहेत. यातून लोकसंख्या वाढल्याने नियमानुसार या भागासाठी स्वतंत्र अग्निशमन केद्राची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. खराडी भागातून 125 कोटी व वडगावशेरी भागातून 50 कोटी मिळकत कराची वसुली पुणे मनपाने या आर्थिक वर्षात केली आहे. एवढे पैसे गोळा केल्यानंतर परिसरात अग्निशमन केंद्र उभारणीवर 4 ते 5 कोटी रूपये खर्च करून अग्निशमन केंद्र मनपा उभे करू शकत नसेल तर हे मोठे दुर्दैव आहे.
– आशिष माने, अध्यक्ष, वडगावशेरी नागरिक मंच