- रस्त्याअभावी आजारी लोकांसाठी करावा लागतोय डोलीचा वापर
कर्जत : भिवपुरी-माथेरान या डोंगरांमध्ये राहणारा आदिवासी समाज आजही उपेक्षित आहे. त्यांच्यापर्यंत पुरेशा पायाभूत सुविधा, जीवनावश्यक साधने आजही पोचली नाही येत. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर त्यांच्या पदरी उपेक्षाच पडली आहे. रस्ता नसल्याने त्यांना आजारी असणाऱ्या एखाद्या इसमाला अथवा गरोदर महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागत आहेत. सागाचीवाडी येथील तरुण पायाला दुखापत झाल्याने घरीच पडून होता. रस्ता नसल्याने रुग्णालयात पोहोचणे शक्य होत नव्हते. तेव्हा गावातील तरुणांनी डोली करून त्याला पावसापासून संरक्षण करत डोंगर उतरून उपचार केले.
कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका मानला जातो. या तालुक्यात कातकरी, ठाकूर, महादेव कोळी, धनगर अशा विविध जमाती डोंगर कोपऱ्यात राहत आहेत. परंतु या समाजापर्यंत प्राथमिक सुविधादेखील नसल्याने या लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सागाचीवाडी, नानाचा माळ, चिंचवाडी, असलवाडी, पाली धनगरवाडी, बोरीची वाडी, धमन दांड वाडी, भूतिवली वाडी, नानाचा माळ धनगरवाडा या ग्रामपंचायतीमधील वाड्यांना आजही पक्का रस्ता नाही. गावातील एखादे व्यक्ती आजारी पडली, अथवा गरोदर महिलांना वेळेत उपचार मिळत नाही.
या वाडीमधून डोंगरावर पक्के रस्ते नसल्याने नेरळ किंवा कर्जतमधील रुग्णालयात पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. रस्ते नसल्याने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना जाणे शक्य होत नाही. सागाची वाडी येथील संदीप निरगुडे हा 25 वर्षीय तरुण पायाला दुखापत झाल्या कारणाने घरीच पडून होता. पावसाअभावी त्याला घरातून निघून हॉस्पिटलला जाणे शक्य होत नव्हते. पाऊस संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी अक्षरशः गावातील तरुणांनी एकत्र येत त्यांना झोळी करत डोलीच्या सहाय्याने दोन नद्या अनवाणी पायाने पार केल्या.
नेरळ येथील सुविधा हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. रस्ते नाहीत व नद्यांना साकव अथवा पूल नाहीत म्हणून हे रस्ते अधिक जोखमीचे झाले आहेत. कोणतेही वाहन पावसाळ्यामध्ये या वाडीपर्यंत पोचू शकत नसल्याने आजारी व्यक्तींना अक्षरशः झोळीमध्ये टाकून डोंगर उतरावा लागतो आहे. या लोकांचे प्रश्न कधी सुटतील? असा तीव्र सवाल विचारला जात आहे.
एखाद्या पुरुषाला आजारपणात वा स्त्रीला गरोदरपणात दवाखान्यात उपचार करण्यासाठी घेऊन जाणे, हे खूप कष्टाचे काम होत असून, एखाद्या माणसाचा यामध्ये जीव गेल्यास या गोष्टीला प्रशासन ज्याने आजतागायत वैद्यकीय सेवा दिली नाही व रस्ते बनवले नाहीत, म्हणून जबाबदार राहील का? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जातो आहे. तसेच स्थानिक नेतेमंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी असल ग्रामपंचायत सरपंच रमेश लदगे व रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर समाज संघटना अध्यक्ष मालू निरगुडा यांनी केली आहे.