पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये शहरात प्रदूषण वाढत असल्याचे दिसून येत आहे. उद्योगनगरी असूनही अनेक वर्ष प्रदूषण नियंत्रणात ठेवणारे पिंपरी-चिंचवड आता प्रदुषणाच्या विळख्यात अडकत आहे.
ध्वनी प्रदूषणाचे मानव व पशू-पक्ष्यांच्या आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन भारत सरकारने 2000 साली ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये ध्वनी पातळी ही प्रदूषण मंडळाच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करणे, नो हॉर्न चे फलक लावणे त्याचबरोबर आवश्यक तेथे नॉइस बॅरियर्ससह आदी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण सद्यःस्थितीचा 2021-22 चा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला आहे. या अहवालात शहरातील विविध भागातील ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या क्षेत्रनिहाय ध्वनी स्तर प्रमाणाची मर्यादा शहरातील विविध भागात ओलांडली आहे.
शहरात निवासी क्षेत्रात दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल्स इतकी ध्वनी मर्यादा हवी. मात्र शहरातील विविध निवासी भागांमध्ये ध्वनीची सरासरी पातळी ही 60 ते 65 डेसिबल इतकी आढळून आली आहे. त्यामुळे निवासी भागात ध्वनी प्रदूषण वाढले आहे. तर, व्यावसायिक भागात दिवसा ध्वनीपातळी 65 तर रात्री 55 डेसिबल असणे अपेक्षित आहे. ही पातळीही सरासरी 70 च्या पुढे गेली आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि प्रदूषण मंडळ उपाय योजनांसाठी काहीच करत नसल्याचे दिसून येत आहे.पाण्याची गुणवत्ता आयएस मानांकनाच्या निर्धारित मर्यादेमध्ये शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता ही आयएस मानांकनाच्या निर्धारीत मर्यादेमध्ये आहे.
महापालिका हद्दीतील काही ठिकाणी पाण्याची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विहित मर्यादेत नसल्याचे नदी, तलाव, भूजल नमुने तपासणी अहवालातून दिसून येते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरी सहभाग आवश्यक असून शहराचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वांच्या योगदानाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण वाढले
शहरात गेल्या तीन वर्षांचा अभ्यास केला तर वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांत 1 लाख 7 हजार 46 नवीन वाहनांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या वाढत्या वापरामुळे हवेतील सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण वाढले असल्याचे अहवालावरुन दिसून येते. शहराच्या विविध परिसरातील वायू प्रदूषण तपासणी करण्यात आली आहे. महापालिका परिसरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन, धूलिकण, कार्बन मोनॉक्साइड हवेतील प्रमाण हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या विहित मर्यादेमध्ये आहे. मात्र पावसाळ्यात ती पातळी तुलनेने कमी झाल्याचे दिसून येते.