सातारा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र केसरीच्या सातारा शहरात होणाऱ्या आखाड्याचा कुस्ती शौकिनांनी आनंद लुटावा, असे आवाहन तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.सातारा शहरामध्ये तब्बल साठ वर्षानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे 64 वे अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. शहरात यापूर्वी 1963 मध्ये बाळासाहेब देसाई व यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंग आप्पा जाधव, शिंगरे पैलवान व साहेबराव पवार यांनी अधिवेशन पार पाडले होते.
यावेळी जिल्हा तालीम संघाला शरद पवार यांच्या आग्रहामुळे यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे आधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरीची स्पर्धा 4 ते 9 एप्रिल दरम्यान शाहू क्रीडा संकुलात होत आहे. त्याच्या तयारीची माहिती साहेबराव पवार यांनी दिली. ते म्हणाले, “माझ्या जीवनाची तब्बल 62 वर्षे तालीम संघ उभारणे व तो यशस्वीरीत्या चालवणे कर्तव्य व जबाबदारी समजून पार पाडले आहे. संस्था उभारणे सोपे पण चालवणे फार कठीण आहे. आज जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या जिल्हा तालीम संघ सातारा व तालीम संघ सातारा या दोन्ही संस्था अतिशय दिमाखाने व डौलाने उभ्या आहेत.
सर्व सातारकरांना व महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व पैलवानांना आग्रहाचे निमंत्रण देत आहे. स्पर्धा ही केवळ एका संस्थेची नसून जिल्ह्यातील सर्व कुस्तीगीर व शौकिनांची आहे.सध्या नवीन पिढीकडे कारभार दिला आहे आणि ते अत्यंत चोख पद्धतीने काम करीत आहेत याचा मला अभिमान आहे.’ या स्पर्धेमध्ये शंकाकुशंका काढून सर्वांनी सामील व्हावं, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याचा पैलवान किरण भगत महाराष्ट्र केसरीचा दावेदार ठरेल अशी दाट शक्यता व्यक्त करून त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी सहभागी व्हावे.
अशी विनंती केली. याप्रसंगी जिल्हा तालीम संघाचे संपतराव साबळे, पैलवान दादा थोरात, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, चंद्रकांत सूळ, आबा सूळ, यशवंत चव्हाण, वैभव फडतर,े संदीप साळुंखे, नितीन राजगे, कांता पैलवान, शेवाळे गुरुजी, सुदाम पावणे, नलवडे, कुस्तीगीर परिषदेचे प्रतिनिधी माणिक पवार, बबन साबळे, रुस्तम तांबोळी, रामदास शिंगटे, जीवन कापले, बलभीम शिंगरे, विकास गुंडगे, राजेंद्र सुळ व जिल्हा तालीम संघाचे सचिव सुधीर पवार उपस्थित होते.