गडचिरोलीतील धक्कादायक घटना ः मुलींच्या लग्नामुळे होते अस्वस्थ
गडचिरोली : गडचिरोली शहरात आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथे सोमवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रवींद्र वरगंटीवार यांचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होते. रवींद्र नागोराव वरगंटीवार (वडील), वैशाली रवींद्र वरगंटीवार (आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाच्या विषयावरुन अस्वस्थ असलेल्या कुटुबीयांची अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते.
याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तिथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली.
तिघांनीही आत्महत्येपूर्वी विहिरीबाहेर मोबाईल आणि चप्पला काढून ठेवल्या होत्या. विहिरीच्या काठावर मोबाईल आढळून आल्यामुळे तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ही माहिती शहरात पसरतात अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.
आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले तरी मुलीच्या आंतरजातीय लग्नातूनच तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चा शहरात आहे. कुणीही या विषयावर कॅमेऱ्यात बोलायला तयार नाही. या ह्रदयद्रावक घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.