रवी ठाकर
पवनानगर -पुणे – मुंबईच्या मध्यावर असलेल्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर असलेल्या मावळ तालुक्यात वर्षाविहार आणि ऐतिहासिक असे गड, किल्ले, धार्मिक स्थळामुळे पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यातमुळे मावळातील तरूणांमध्ये व्यवसायिकता वाढीस लागल्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा व पवना धरण परिसरात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वेगाने वाढू लागल्यामुळे या परिसरात पर्यटकांना लागणाऱ्या खाद्य पदार्थांच्या दुकानांची गरज निर्माण झाली.त्यातून अनेक तरुण या व्यवसायात उतरले आहेत.
मावळ तालुक्याच्या डोंगरी भागात मुसळधार पावसामुळे वर्षाविहारासाठी मुंबई, पुणे, खडकी, दापोडी, पिंपरी चिंचवड आणि तळेगाव परिसरातील तरुणाई एक दिवसाच्या सहलीला आर्वजून जात असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खाद्य पदार्थातील वडापाव, भजी, मिसळ अशा नाष्ट्याची व्यवस्था स्थानिक तरुणांनी सुरू केल्याने त्यांना रोजगाराच्या माध्यमातून चांगली कमाई होवू लागल्याने तरूणामध्ये उद्योजकता वाढीस लागली आहे.
मावळच्या डोंगरी भागात असलेले गड, किल्ले आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही कायमस्वरूपी स्थानिकांची व्यवसायिक दुकाने उभी राहिल्याने अनेक तरुणांना आणि महिलांना जागेवरच रोजगार उपलब्ध झाला आहे. या सर्वामुळे मावळच्या विकासात तरुणाचा सहभाग वाढत असून बेरोजगारी कमी होऊ लागली आहे.
प्रवासी वाहतुकीचा नवा पर्याय
वर्षाविहाराच्या लोणावळा, खंडाळा, पवना धरण परिसर, कार्ला, भाजे, आंदर मावळ परिसर आदी भागात मक्याची कणसे, शेंगा यांच्या हातगाड्या, टपऱ्या या पर्यटन स्थळावर उभ्या राहिल्या त्यातून उद्योजक तरुण या व्यवसायात येऊ लागले आहेत. पुणे आणि पुणे परिसरातून रेल्वे गाडीने येणारे पर्यटकांना पर्यटन स्थळी जाण्याकरिता रिक्षा, सहा सीटर, एस टी बस आणि खाजगी वाहने वाहतुकीसाठी यांना चांगला रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक तरुणानी बेरोजगार राहण्यापेक्षा प्रवासी वाहतूक व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.