मुंबई – गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील रोजगार, पगार वाढ आणि बोनसवर परिणाम झाला होता. मात्र यावर्षी रोजगार वाढण्याबरोबरच पगार आणि बोनसही वाढण्याची शक्यता असल्याचे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे.
मायकेल पेज टॅलेंट या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी वर्ष सुरू होत असतानाच करोना व्हायरस उद्भवल्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना बोनस आणि पगार वाढीला मुकावे लागले होते. विचारणा करण्यात आलेल्या 60 टक्के कंपन्यांनी यावर्षी त्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि बोनस देणार असल्याचे सांगितले आहे. तर 30 टक्के कंपन्या आकडेमोड करीत असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मागणी वाढत असल्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज लागणार असल्यामुळे 61 टक्के कंपन्या कर्मचारी भरती करणार आहेत. सर्वेक्षणातील माहितीनुसार 55 टक्के कंपन्यांनी सांगितले की आम्ही कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील 44 टक्के कंपन्यांनी सांगितले की हा बोनस एक महिन्याच्या पगारापेक्षा जास्त जाणार आहे.
मात्र विविध क्षेत्रात पगार वाढ विविध प्रमाणात होणार असल्याचे दिसून येते. आरोग्य आणि जैवविज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना किमान आठ टक्के पगार वाढीची अपेक्षा आहे. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 7.6 टक्के, ई कॉमर्स आणि इंटरनेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 7.5 टक्के तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्याना 7.3 टक्के पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 6.8 टक्के पगार वाढीची अपेक्षा आहे.
सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 6.7 टक्के, रिटेल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 6.1 टक्के, वाहतूक आणि वितरण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 6 टक्के, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 5.9 टक्के तर नैसर्गिक साधन संपत्ती आणि ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 4.9 टक्के पगार वाढीची अपेक्षा आहे. बांधकाम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना यावर्षी 5.3 टक्के पगार वाढ होऊ शकेल.
करोनाचा विविध क्षेत्रावर वेगवेगळा परिणाम झालेला आहे. या क्षेत्रांच्या पुनरुज्जीवनाचा कालावधी वेगवेगळा आहे. त्यामुळे पगार वाढ आणि बोनसमध्ये समानता दिसून येत नाही असे या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
स्थानिक पातळीवरील छोट्या कंपन्या आपले निर्णय वेगात घेऊ शकतील मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांना जागतिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल असे मायकेल पेज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निकोलस डुमोलीन यांनी सांगितले. गेल्या वर्षी भारतात नव्या नियुक्त्यांमध्ये 18 टक्के घट झाली होती. यावर्षी यात भरपूर वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.