गुंतवणूकदारांवर परिणाम होणार असल्याचा दावा
नवी दिल्ली – लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे एलआयसीच्या कर्मचाऱ्यांच्या तीन संघटनांनी या कंपनीच्या निर्गुंतवणुकीला ठाम विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यामध्ये एलआयसीच्या आयपीओसाठी सल्लागार नेमण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
यावर या तीन संघटनांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जर एलआयसीची निर्गुंतवणूक केली तर कंपनीबरोबरच अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सरकारने एलआयसीचा आयपीओ जारी करू नये. आम्ही केवळ हे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सांगत नाही तर निर्गुंतवणूक केल्यास भारतीय समाजावर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे आम्हाला वाटते.
एलआयसीवर जनसामान्यांचा विश्वास आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी एलआयसीचे सध्याचे स्वरूप बदलू नये. एलआयसी सध्या 32 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. जर निर्गुंतवणूक झाली तर ही गुंतवणूक करणाऱ्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो.