लोणावळा – रसायनाची वाहतूक करणारा टॅंकर मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खंडाळा बोरघाटातील जुन्या अमृतांजन पुलाच्या पुढील वळणावर पलटी झाला. त्यामुळे एक्सप्रेस हायवेवर पहाटे साडे चार वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या पंधरा किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. अकरा तास ही वाहतूक कोंडी कायम होती.
महामार्गावर पलटी झालेले टॅंकरमधून मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचे रसायन रस्त्यावर सांडल्याने व त्यावरून वाहने घसरू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मार्ग बंद करण्यात आली होती. या रसायनावर माती व बारिक खडी पसरवत हे रसायन बाजूला काढल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई -पुणे एक्सप्रेस वेची मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
मात्र सकाळपासून एक्सप्रेस वे व जुन्या हायवेवर मोठया प्रमाणात वाहतूककोंडी होऊन कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा गेल्याने पूर्णतः वाहतूक पूर्ववत होण्यास दुपारचे साडेतीन वाजले. दरम्यान अपघातानंतर एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक बंद करत वाहने जुन्या हायवेने लोणावळा शहरातून वळविण्यात आली. त्यामुळे लोणावळा शहरात देखील वाहतूक विस्कळीत झाली होती. जुन्या हायवेवर खंडाळ्यापासून कार्ला फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शनिवार, रविवारच्या सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक, प्रवासी व वाहनचालकांचे मोठे हाल झाले. कित्येक तास वाहने जागीच थांबून राहिल्याने चालकांचे व गाडीतील अन्य नागरिकांचे हाल झाले. पिण्याचे पाणी देखील मिळणे दुरापास्त झाले होते. सर्वच यंत्रणा व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काम सुरू केले. मात्र रसायनाला हवेचा स्पर्श होताच ते मेणासारखे होत होते त्यामुळे काम अधिक कठीण झाले होते. आयआरबी पेट्रोलिंग व देखभाल दुरुस्ती विभाग, खंडाळा व बोरघाट महामार्ग पोलीस, सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आदींनी सकाळपासून मदतकार्य राबविले.