पिंपरी – निवडणुकीच्या काळामध्ये पैशांची उलाढाल मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. मतदारांना पैशाचे आमिषही उमेदवारांकडून दाखवण्यात येते. ही बाब रोखण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक काळामध्ये बॅंकामधील व्यवहाराच्याबाबत लक्ष ठेवण्याचे आदेश निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेला लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेल्या तारखेपासून बॅंक खात्यात संशयितरित्या होणाऱ्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार, संशयास्पद व्यवहाराविषयी माहिती संबंधित बॅंकानी कळवावी, असे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत.
निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखवून आकर्षित करण्यात येत असते. यामुळे, आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अशा गोष्टींकडे निवडणूक विभागाचे लक्ष असते. निवडणुकीच्या काळात राजकीय लोकांकडून मोठे अर्थिक व्यवहार होण्याची शक्यता असते. त्यामुळे, निवडणूक विभागाने बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्था, वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांनी निवडणुकीच्या काळात कोणत्या गोष्टीची दक्षता घ्यावी याची माहिती देण्यात आली आहे.
मागील दोन महिन्यांपासून एखाद्या खात्यावर डिपॉझिट किंवा विड्रॉवल असा कोणताही व्यवहार झालेला नसेल आणि निवडणुकीच्या काळात या खात्यावर एक लाख रुपयापेक्षा अधिकचा व्यवहार हा संशयित व्यवहार म्हणून गृहीत धरला जाणार आहे.
तसेच निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या खात्यावर एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम संशयितरित्या आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे हस्तांतरित केल्यासही तपासणी केली जाऊ शकते. तसेच, निवडणुकीसाठी उघडण्यात आलेल्या खात्यावर दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरुपात स्वीकारु नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत.
उमेदवाराने काढलेले खाते हे “केवायसी’ परिपूर्ण असावे, या खात्याला तातडीने चेकबुक देण्याची व्यवस्था बॅंकानी विनाविलंब करावी, निवडणुकीच्या कामकाजासाठी उघडण्यात आलेल्या खात्यांना प्राधान्य द्यावे, तसेच उमेदवारांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीला या खात्यामध्ये व्यवहार करण्यासाठी प्राधान्य द्यावे, एखाद्या खात्यामध्ये दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा किंवा काढण्यात आली असेल तर अशा खात्याबाबत प्राप्तीकर खात्याच्या समन्वय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे.