नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज २२ विरोधी पक्षांद्वारे करण्यात आलेल्या, ईव्हीएम मशिन्समधील संपूर्ण मतमोजणी करण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघातील ५ मतदानकेंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतांची जुळणी व पडताळणी करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण मतदान मोजणी प्रक्रिया आटोपल्यानंतरच त्या मतदारसंघातील ५ मतदारसंघांमधील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्समधील मतदानाची जुळणी करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, याच पार्शवभूमीवर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा प्रसिद्ध विधिज्ञ अभिषेक मनू संघवी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप लावले आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढताना संघवी यांनी, “व्हीव्हीपॅटद्वारे झालेल्या मतदानाची जुळणी व पडताळणी करणं महत्वाचं असताना देखील ते मोठ्या प्रमाणात का केलं जात नाही? यामागचं कारण निवडणूक आचार संहिते’ची ‘मोदी प्रचार संहिता’ झाली आहे हे आहे काय? तुम्ही ईव्हीएम मशिन्सच्या विश्वासहार्यतेबाबत काहीच करणार नाही का? की तुम्ही ईव्हीएमचा अर्थ इलेक्शन व्हिक्ट्ररी मशिन्स फॉर बीजेपी असा करणार आहे का?” असे प्रश्न उपस्थित केले.