मुंबई: लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्यावर येऊन ठेपले आहेत. ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात आणि देशातही मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभेमुळे जोरदार चर्चेत राहिली. त्यांनी आपल्या जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ले चढवले. त्यामुळे या सभांचा विरोधकांना किती फायदा होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार नसताना प्रचाराच्या मैदानात उतरले. ते विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान लोकसभा निकालापूर्वी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरेंबद्दल आपले मत मांडले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकांचे निकाल कशा प्रकारे लागतील हे पाहू, त्यानंतर राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही याबाबत ठरवू. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाऊन स्वतःची प्रतिमा सुधारली होती. मोदींच्या हुकूमशाहीला राज ठाकरेंनी केलेला विरोध सर्वांनीच पाहिला आहे. कोणत्याही पक्षाबरोबर विचारांची बेरीज होणं गरजेचं असतं. सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले.