पुणे – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी व भाजप नेत्यांमध्ये दररोज शाब्दिक खटके उडताना दिसतायेत. अशातच आज भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी राव यांनी, ‘महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारखा पार्ट टाइम मुख्यमंत्री नको तर फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा आहे.’ असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. सी टी राव यांच्या या वक्तव्याला आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना, “भाजपाचे आरोप नवे नाहीत. जेव्हापासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकासआघाडी सरकार स्थापन झालंय त्या दिवसापासून भाजपाचे आरोप सुरू आहेत. आम्ही या आरोपांकडे लक्ष न देता राज्य सरकार कोविडच्या संकटाचा सामना करत आहे. तसेच विकास कामं करत आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मदतही केली,” अशी प्रतिक्रिया दिली.
मोदींकडूनही ठाकरे सरकारच कौतुक
“कोविडचं संकट आलं केवळ राज्यावर किंवा देशावर नाही, तर जगावर आलंय. महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविडचं योग्य नियोजन केलं. त्याचं कौतुक सर्वोच्च न्यायालयानं केलं आणि पंतप्रधान मोदींनी देखील कौतुक केलं.”
सरकार उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतंय
एकीकडे कोविडचं संकट, दुसरीकडे अतिवृष्टी, तिसरीकडे निसर्ग चक्री वादळ ही संकटं आली. अशा परिस्थितीतही सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. दोन्ही वेळी १०-१० हजार कोटी रुपयांचं पॅकेज देऊन मदत केली. अशा परिस्थितीत देखील विकास कामांना कुठेही कात्री लावली नाही. त्यामुळे सरकार उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतंय हे चित्र स्पष्ट आहे.” असं देखील मंत्री शिंदे म्हणाले.