मुंबई – रझा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या व्यापाऱ्यांना मारहाण झाली, दुकानाची तोडफोड झाली, त्यांना भेटण्यासाठी आपण अमरावती दौऱ्यावर येत असल्याचे पत्र भाजप नेते किरिट सोमय्या यांनी अमरावती पोलिसांना पाठवले आहे. मात्र, अमरावती पोलीस आयुक्तांनी अमरावती शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा असे पत्र पाठवले आहे. मात्र, सोमय्या त्यांच्या दौऱ्यावर ठाम असून आपण अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी म्हंटले होते. मात्र आता दौरा पुढे ढकलल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते 15 दिवसानंतर अमरावतीला जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने अमरावतीत मोर्चा काढला होता. त्यावेळी काही ठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. या हाकेला प्रतिसाद देत काही हिंदू संघटनांनीही मोर्चा काढला. या मोर्चादरम्यानही दगडफेक, तोडफोडीसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचे वातावरण आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे वातावरण अधिक दुषित होत असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहेत.
दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. दोन दिवस शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते.