मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, ‘महाराष्ट्रातून, विशेष करून मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.’ असं वादग्रस्त विधान केलं होत. त्यांच्या याच वक्तव्याचा आता राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शबदांमध्ये राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलंय. अशातच आता खुद्द राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत खुलासा केला आहे.
कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ – उद्धव ठाकरे कडाडले
काय म्हणाले राज्यपाल?
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.
पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे.
“राज्यपालांच्या वक्तव्याबाबत शिंदे-फडणवीसांची स्पष्ट भूमिका,म्हणाले…
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला असला तरी यामध्ये त्यांनी वक्तव्य मागे घेत असल्याचा, दिलगिरी व्यक्त करत असल्याचा अथवा माफी मागत असल्याचा उल्लेख केलेला नाही. उलट आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यामुळे हा वाद इतक्यात निवळण्याची चिन्ह नसून पुढे काय होत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.